CJP Protest: आजही संसदेपर्यंत सीजेपीचा मार्च? अभिजीत दिपकेंचे मोठे वक्तव्य, काय आहे प्लॅन?
CJP Protest March on Parliament: NEET परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मागण्यांसाठी आज कॉक्रोच जनता पार्टी आज पुन्हा संसदेकडे कूच करणार का? काल आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. ते पाहता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काय आहे मोठा प्लॅन?

CJP Protest March on Parliament: काल जंतरमंतरवरील आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. यामध्ये 100 हून अधिक पोलीस जखमी झाले. तर अनेक आंदोलकांवर लाठीचार्च करण्यात आला. त्यात काही जण जखमी झाले. या आंदोलनानंतर आज मंगळवारी 21 जुलै 2026 रोजी पुन्हा आंदोलक संसदेकडे मार्च नेतील का? असा सवाल विचारल्या जात आहे. त्यावर काँक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे. काल हिंसक आंदोलनानंतर दिपके हे जंतरमंतरवर परतले आणि एका तंबूतून त्यांना आंदोलन सुरू ठेवले. आम्ही पुन्हा मार्च करणार, संसदेकडे कूच करणार असे दिपके यांनी स्पष्ट केले. CJP चे आंदोलक 6 जूनपासून जंतर-मंतरवर तळ ठोकून आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांना हुसकावले. पण आंदोलकांनी पुन्हा मैदानावर ठाण मांडले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आहे. सध्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात भरती केलेले आहे.
लवकरच पत्रकार परिषद
CJP च्या पदाधिकाऱ्यांनी काल जे. पी. नड्डा यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील मार्चचे धोरण ठरवण्याविषयी आज सकाळपासून बैठक सुरू आहे. थोड्याचवेळात जंतरमंतरवर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यातून पुढील धोरण जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
जंतर-मंतरवर ठिय्या आंदोलन
संसद मार्चवर काल पोलिसांनी लाठीमार केला. अनेक आंदोलकांना लाठ्या खाव्या लागल्या. त्यात तरूण, तरुणींना पोलिसांनी आमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. काहींनी दगड भिरकावल्याने एकच धुमश्चक्री उडाली होती. पोलिस कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाल्याचा व्हिडिओ समोर आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 118 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर अनेक आंदोलक जखमी झालेत. घटनेवेळी या परिसरात 1,000 अधिक आंदोलक होते. यावेळी हजारो पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईंवर असंतोष
जेव्हा पोलिसांना विचारण्यात आले की, मंगळवारी आंदोलकांनी संसदेकडे कूच केले तर काय कराल? त्यावर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, सुरक्षा व्यवस्था चोख असेल. पुन्हा बॅरियर लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोनमधील व्हिडिओ आधारे दिल्ली पोलिस पुढील कारवाई करणार आहे. कालच्या हिंसक घटना या मोठ्या गुप्त कटाचा भाग तर नाही ना? या आधारे पोलीस तपास करणार आहेत.
