CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. जे इतर कुठल्या राज्यांना अद्याप जमलं नाही, ते थलपती विजय यांनी करून दाखवलं आहे.

CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता विजय यांनी विधानसभा अधिवेशनात महिलांसह सर्वसामान्य कुटुंबांसाठी महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली. ‘Annapoorani Super Six’ या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना पोंगल 2027 पासून लागू होणार असून राज्यातील सुमारे 1.30 कोटी कुटुंबाना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी खरेदी केलेली तीन LPG सिलिंडरची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा भार पडण्याचा अंदाज आहे. वाढत्या गॅसच्या किमती आणि घरगुती खर्चाचा वाढता बोजा लक्षात घेऊन ही योजना आणली आहे.
विजय यांनी विधानसभेत सांगितलं, सध्याच्या परिस्थितीत स्वयंपाकाच्या गॅसची वाढती किंमत आणि पुरवठ्यातील अडचणी यांमुळे सामान्य कुटुंबांवर आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे सरकारने जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही मदत देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सहा मोफत सिलिंडरचं आश्वासन, प्रत्यक्षात तीन
विशेष म्हणजे टीव्हीकेनं निवडणुकीपूर्वी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला सहा मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर विजय सरकारने सध्या तीन सिलिंडरची घोषणा केली आहे. याचबरोबर महिलांसाठी मोफत बस प्रवासाची योजनाही विस्तारित करण्यात आली आहे. महिलांना आता साध्या बससोबत एक्स्प्रेस, एलएसएस आणि डिलक्स बसमध्येही मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा आंतरजिल्हा बससेवांनाही लागू करण्यात येणार आहे. तसंच ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही मोफत बस प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे.
विजय यांच्या ‘सुपर सिक्स’ची चर्चा
निवडणुकीपूर्वी विजय यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वाची आश्वासनं दिली होती. त्यामध्ये मोफत एलपीजी सिलिंडर, महिलांना मासिक आर्थिक मदत, मोफत बस प्रवास, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि लग्नासाठी सोन्याची मदत यांचा समावेश होता. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांच्या सरकारकडून या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ‘अन्नापुरानी सुपर सिक्स’ योजनेचा लाभ नेमक्या कोणत्या कुटुंबांना मिळणार आणि त्यासाठी पात्रतेचे निकष काय असतील, याकडे तमिळनाडूतील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
