हिंदू, मुसलमानच नाही तर घुसखोरांनाही 450 रुपयांत गॅस सिलेंडर…काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फोडणी

घुसखोरांना ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याची योजना काँग्रेसचे सरकार आल्यावर सुरु करणार आहे. त्यांचे हे वक्तव्य देशविरोधी आहे. फक्त अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या त्यांच्यावर कारवाई करावी

हिंदू, मुसलमानच नाही तर घुसखोरांनाही 450 रुपयांत गॅस सिलेंडर...काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फोडणी
| Updated on: Nov 15, 2024 | 10:02 AM

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठी निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यात २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. आता झारखंड काँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांनी राज्यात सरकार आल्यावर ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. परंतु गॅस सिलेंडर देताना हिंदू, मुसलमान, घुसखोर काहीच पाहिले जाणार नाही. सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजप या प्रकरणात चांगलीच आक्रमक झाली आहे.

४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर

झारखंडमधील चंद्रपुरामध्ये काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्यासाठी काँग्रेस राज्य प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी ते म्हणाले, राज्यात महागठबंधनची सरकार आल्यावर हिंदू-मुस्लिमासह सर्व घुसखोरांना ४५० रुपयांमध्ये सिलेंडर दिले जाणार आहे. आम्ही आश्वासन देतो १ डिसेंबरपासून राज्यात ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. मग त्यासाठी हिंदू, मुसलामान, घुसखोर किंवा इतर काहीच पाहिले जाणार नाही. सर्वांना गॅस सिलेंडर देण्याचे आमचे आश्वासन आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर म्हणाले…

व्हिडिओ व्हायरल होताच गुलाम अहमद मीर यांनी आपल्या वक्तव्यावरुन यु टर्न घेतला. ते म्हणाले, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. काँग्रेस पक्ष भेदभाव न करता लोकांना मदत करतो. भाजप ज्यांना घुसखोर म्हणत आहे, ते सर्वसामान्य जनतेला सांगू शकलेले नाहीत, दहा वर्षे भारत सरकारमध्ये राहूनही ते घुसखोर ओळखू शकलेले नाहीत. आम्ही सरकार बनल्यावर कोणताही भेदभाव न करता राज्यातील जनतेला मदत करणार आहे.

गुलाम अहमद मीर यांनी भाजपला टीकेची आयतीच संधी दिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. भाजप झारखंडचे प्रवक्ता प्रतुल शाह म्हणाले, घुसखोरांना ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याची योजना काँग्रेसचे सरकार आल्यावर सुरु करणार आहे. त्यांचे हे वक्तव्य देशविरोधी आहे. फक्त अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शाह यांनी केली आहे.