राज्यसभेत पैशांचं बंडल मिळालं, अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप फेटाळले, म्हणाले, ‘केवळ 3 मिनिटांसाठी सभागृहात गेलो आणि…’
राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात एका खासदाराच्या सीटवर मोठी रक्कम सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तेलंगणाचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या जागेच्या खाली ही रक्कम सापडली, असा आरोप करण्यात आला आहे. सिंघवी यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी राज्यसभेच्या सभागृहात 222 क्रमांकाच्या सीटवर पैशांची गड्डी मिळाल्याची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली. “काल (गुरुवारी) संसदेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की, 222 नंबरच्या सीटखाली आम्हाला पैशांचं बंडल मिळालं. संबंधित जागा ही तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्यासाठी अलॉट करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी आता नियमांनुसार व्हायला हवी आणि आता ती होत देखील आहे”, असं जगदीप धनखड म्हणाले. जगदीप धनखड यांनी संबंधित माहिती दिल्यानंतर सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरु केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “जोपर्यंत या प्रकरणाच्या तपासातून सर्व गोष्टी समोर येत नाहीत तोपर्यंत तुम्ही (सभापती) त्यांचं (अभिषेक मनु सिंघवी) नाव घ्यायला नको होतं.” खर्गे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड गदारोळ झाला.
अभिषेक मनु सिंघवी यांची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, या आरोपांवर अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यासाठी ही गोष्ट अतिशय गंभीर आणि हास्यास्पद आहे. मी गुरुवारी केवळ तीन मिनिटांसाठी सभागृहात गेलो होतो. दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी संसदेत दाखल झालो होतो. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी 1 वाजता जेवणाची सुट्टी झालीय. यानंतर मी संसदेतील कॅन्टीनमध्ये दीड वाजेपर्यंत अयोध्याचे खासदार प्रसाद रेड्डी यांच्यासोबत जेवण केलं. त्यानंतर मी सुप्रीम कोर्टात परतलो होतो. कारण एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी होती”, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
“संसदेत प्रत्येकाची जागा निश्चित असायला हवी. संबंधित जागेवर लॉक असायला पाहिजे ज्याची चावी फक्त संबंधित खासदाराकडे असायला हवी, जेणेकरुन प्रत्येक सदस्य आपल्या निश्चित जागेवर बसू शकतील”, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. दरम्यान, अभिषेक मनुसिंघवी यांनी ट्विट करतही आपली भूमिका मांडली आहे. “आपण राज्यसभेत जातो तेव्हा आपल्याकडे केवळ 500 रुपयांची एक नोट असते”, असं अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.