
Eknath Shinde Answer To Rahul Gandhi : गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशात मतचोरी केली जात आहे, असा गंभीर आरोप करत आहेत. निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपा यांच्या संगनमताने हा प्रकार चालू असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे हटवण्यात (डिलिट) आली असा आरोप आता राहुल गांधी यांनी केला आहे. हा आरोप करताना राहुल गांधींनी पहिल्यांदाच तेथील लोकांना समोर आणून पुरावे सादर केले आहेत. त्यांनी काही व्हिडीओ क्लिपही दाखवल्या आहेत. त्यांच्या या गंभीर आरोपांनंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. काँग्रेसचा विजय झाला की? ते मतचोरीची आरोप करत नाहीत. त्यांचा पराभव झाला तरच ते असे आरोप करतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.
राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुमच्याकडचे पुरावे सादर करा. पण हे पुरावे सादर न करता ते फक्त आरोप करत आहेत. कर्नाटकमधील आलन मतदारसंघामध्ये मतं चोरी झाली असेल तर त्याच मतदारसंघात काँग्रेसचा भोजराज पाटील हा उमेदवार कसा निवडून आला? तिथे काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला असेल तर मग मतं काँग्रेसने चोरली की भाजपाने चोरली? असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.
तसचे, फक्त आरोप करायचे. त्यांनी निवडणूक आयोगाला पुरावे दिलेले नाहीत. खोटा प्रचार करायचे काम, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर ते निवडणूक आयोगाला द्यावेत. निवडणूक आयोगाने न ऐकल्यास त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत. ते जेव्हा जिंकतात तेव्हा ते आरोप करत नाहीत. मात्र ते जेव्हा पराभूत होतात तेव्हाच त्यांच्याकडून आरोप केला जातो, असा पलटवारही शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.
ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेण्याची पद्धत ही यूपीएच्या काळात सुरू झाली. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया ही चुकीची आहे, असे त्यांना म्हणायचे आहे का? असा रोखठोक सवाल शिंदे यांनी राहुल गांधींना विचारला. मतचोरी करण्याचे काम 14 ते 15 वर्षांपासून चालू आहे, असे ते सांगत आहेत का. आता 15 वर्षांपूर्वी सत्तेत कोण होतं? असे विचारत शिंदे यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानेदेखील फेटाळले आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.