पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला, ‘त्या’ दाव्याची भारताकडून पोलखल; नागरिकांसाठी मोठं आवाहन

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतावर अनेक खोटे आरोप केले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी बठिंडा एअरफिल्डवर हल्ला झाल्याचे खोटे प्रसारण केले. पीआयबीने हे सर्व दावा खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे आणि भारताने पाकिस्तानाच्या खोट्या प्रचाराला तोंड देण्यासाठी तथ्ये मांडली आहेत.

पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला, त्या दाव्याची भारताकडून पोलखल; नागरिकांसाठी मोठं आवाहन
Fact Check
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2025 | 5:51 PM

भारत-पाकिस्तान दरम्यान प्रचंड तणाव सुरू आहे. दोन्ही बाजूने सीमेवर हल्ले होत आहेत. मिसाईलचा वापर केला जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारताच्या 26 ठिकाणांवर हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत. हल्ल्यात यशस्वी होता येत नाही म्हणून आता पाकिस्तानने अफवा, खोटेपणाचा बाजार मांडला आहे. भारताबाबतचं धडधडीत खोटं बोलून पाकिस्तान खोटा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे. बरं आम जनतेतच नाही तर त्यांच्या संसदेतही पाकिस्तानने धडधडीत खोटी माहिती दिली आहे. पाकिस्तानचा हा असत्याचा बुरखा PIBने टराटरा फाडला आहे.

पाकिस्तानी सैन्याने बठिंडा एअरफिल्ड संपूर्णपणे नेस्तनाबूत केल्याचं पाकिस्तानच्या पीटीव्ही या चॅनलने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पीआयबीने पाकिस्तानच्या या खोटेपणाचा पर्दाफाश केला आहे. पीआयबीने फॅक्ट चेक करून पाकिस्तानचा मीडियाही कशी खोटी माहिती देऊन आपल्याच देशातील जनतेची आणि जगाचीही दिशाभूल करत आहे, हेच उघड केलं आहे.

तो दावा खोटाच

बंठिंडा एअरफिल्ड पूर्णपणे नेस्तनाबूत केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे. पाकिस्तानचा हा दावा खोटा आहे. पाकिस्तानचं हे खोटारडेपण उघड करतानाच बठिंडा एअरफिल्ड पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आणि चालू असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. एअरफिल्डचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियाच्या दाव्यांवरही विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

पीआयबीकडून वारंवार पोलखोल

भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान सोशल मीडियात फेक न्यूज अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता असून त्यातून अनुचित गोष्टी घडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पीआयबीने सातत्याने या फेक न्यूज ट्रॅक करणं सुरू केलं आहे. फेक न्यूज आणि खरी बातमी लोकांसमोर आणण्याचं काम पीआयबी करत आहे. तसेच लोकांनी अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा असं आवाहनही करण्यात आलं आहे.

पाकिस्तान हादरला

पहलगाममधील अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तान व्याप्त पीओकेत हल्ला करून अतिरेक्यांवर निशाणा साधला आहे. हा निशाणा साधताना सामान्य लोकं आणि पाकिस्तानी सैन्याला धक्का लागणार नाही याची काळजीही भारताने घेतली आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 100 हून अधिक अतिरेकी मारल्याचं सूत्रांनी सांगितलं. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांमध्ये टॉपचे 5 अतिरेकी आहेत. भारतीय सैन्याने या कारवाईचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवलं आहे.