Railway accident : पॅसेंजर आणि मालगाडीची समोरासमोर धडक, भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू
मोठी बातमी समोर येत आहे, पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची समोरा-समोर धडक झाली, हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या या अपघातामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली असून, मृतांमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे. तर अनेक जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रेनमध्ये अजूनही काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मालगाडी आणि पॅसेंजची समोरा-समोर धडक झाली. लाल खदान रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे, पॅसेंजर रेल्वे ही रायगडवरून येत होती, याचदरम्यान हा अपघात झाला आहे.
बचाव कार्याला सुरुवात
दरम्यान मालगाडी आणि ट्रेनची समोरासमोर धडक झाली, या अपघातामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला, अपघाताची माहिती मिळताच तातडीनं एसडीआरएफ आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं, बचाव पथकानं रेल्वेमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांची सुटका केली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वे अधिकारी आणि स्थानिक आमदार देखील घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात एवढा भीषण होता की रेल्वे ट्रॅक देखील पूर्णपणे बाधित झाला आहे. याचा मोठा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर झाला असून, अपघातानंतर रेल्वे डबे रूळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या अपघातानंतर अनेक प्रवाशी हे रेल्वेच्या डब्यात अडकले होते, त्यांना डब्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या अखेर गॅस कटरच्या मदतीनं रेल्वेचा डबा कट करून या प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, तसेच मृत आणि जखमी व्यक्तींचे नातेवाईक देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. ते सातत्यानं बचाव कार्याची माहिती घेत असून, त्यांनी स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. बचाव कार्य वेगानं करा, जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या व्यक्तींना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे.
