140 कोटी भारतीयांनी लघवी केली तरी पाकिस्तानात त्सुनामी येईल; मिथुन चक्रवर्ती भडकले

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची पोकळ धमकी दिली होती. याला प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी उत्तर दिले आहे.

140 कोटी भारतीयांनी लघवी केली तरी पाकिस्तानात त्सुनामी येईल; मिथुन चक्रवर्ती भडकले
mithun
| Updated on: Aug 12, 2025 | 7:09 PM

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अशातच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची पोकळ धमकी दिली होती. भारताने जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते असं झरदारी यांनी म्हटलं आहे. यावर आता प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मिथुन चक्रवर्ती नेमकं काय म्हणाले?

सिंधू नदीच्या पाण्यावरून बिलावल भुट्टो यांनी भारताला धमकी दिली होती. यावर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले की, ‘पाकिस्तानच्या लोकांबद्दल आम्हाला समस्या नाही. पाकिस्तानचे लोक चांगले लोक आहेत. पण जर त्यांचे नेते असेच अर्वाच्च बोलत राहिले तर आमची खोपडी सटकेल आणि मग एका मागून एक ब्रह्मोसचा वापर केला जाईल. मात्र असे काहीही झाले नाही तर आपण एक धरण बांधू आणि 140 कोटी लोक त्यात लघवी करतील. गोळीबार होणार नाही, मात्र लघवीमुळे पाकिस्तानात त्सुनामी येईल.’

भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानची शेती धोक्यात

हजरत शाह अब्दुल लतीफ भिट्टाई यांच्या 282 व्या उरूसाच्या कार्यक्रमात भुट्टो यांनी भारताला ही धमकी दिली होती. दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतलेली आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबवलेला आहे, त्यामुळे पाकिस्तानातील शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमकी दिली जात आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान भयभीत

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना भारताने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. यात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा निर्णय झाला होता, मात्र त्यानंतर आता पाकिस्तानी नेते भारताला धमक्या देत आहेत.

ऑपरेशन सिंदूरमुळे देश एकवटला

भारताच्या ऑपरेशन सिंदूरला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला होता. देशाच्या कानाकोपऱ्यात सैन्याचे कौतुक करण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण देशाला एकत्र केले. या नावाने संपूर्ण देशात नवीन उर्जा संचारली होती. या ऑपरेशनमुळे देशातील एकी समोर आली होती.