
India Pakistan War Update : सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या दोन्ही देशांत युद्ध भडकलं तर त्याचा फटका संपूर्ण जगाला बसू शकतो. त्यामुळेच अमेरिकेने मध्यस्थी करत दोन्ही देशांत शस्त्रसंधी घडवून आणली आहे. त्याआधी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला पाणी पाजलंय. याच ऑपरेशन सिंदूरची माहिती भारतीय लष्करातील तिन्ही दलांनी दिली आहे. मात्र एकीकडे युद्धजन्य परिस्थितीची माहिती देत असताना भारतीय लष्कराने स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे विराटचं उदाहरण देत लष्कराने भारतीय सेनेची तत्परता आणि योजना याबाबत सांगितलं आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई माहिती देत होते. यादरम्यान त्यांनी क्रिकेटचे उदाहरण दिले. तसेच मी विराट कोहलीचा चाहता असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रिकेटचे उदाहरण देऊन त्यांनी सेनेने कारवाई कशी केली हे सोप्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 1970 च्या दशकातील इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना आणि डेनिस लिली यांच्या गोलंदाजीचे उदाहरण दिले.
“आज क्रिकेटविषयी थोडं बोललं पाहिजे. कारण आज भारताचा क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. अनेक भारतीयांप्रमाणे विराट कोहली हा माझादेखील आवडता क्रिकेटपटू आहे. 70 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात प्रसिद्ध अॅसेस सिरीज चालू होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे डेनिस लिली आणि जेफ थॉमसन दोन चांगले वेगवान गोलंदाज होते. क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे फार मोठे नाव आहे. त्यांनी इंग्लंडच्या फंलदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं,” अशी आठवण राजीव घई यांनी सांगितली.
#WATCH | Delhi | DGMO Lieutenant General Rajiv Ghai says, “Targetting our airfields and logistics is way too tough… I saw that Virat Kohli has just retired from test cricket; he is one of my favourites. In the 1970s, during the Ashes between Australia and England, two… pic.twitter.com/B3egs6IeOA
— ANI (@ANI) May 12, 2025
तसेच, त्यावेळी ऑस्ट्रेलियाने एक म्हण आणली होती. फ्रॉम अॅशेस टू अॅशस अँड डस्ट टू डस्ट इफ थॉमो डोन्ट गेट , देन लिली शुअरली मस्ट अशी ती म्हण होती. तुम्ही भारतीय लष्कराच्या लेअर्स पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की पाकिस्तान सर्व यंत्रणेला पार करण्यात यशस्वी ठरला तरी एअर फिल्ट, लॉजिस्टिक्स इन्सुलेशनपर्यंत पोहोचण्याआधी भारताच्या एअर ग्रीडची सिस्टिम हा हल्ला जरूर अयशस्वी करेल,” असे राजीव घई यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमो यांच्यात युद्धासंबंधी चर्चा होणार आहे. या चर्चेतून नेमकं काय समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.