Ranchi Plane Crash : घनदाट जंगल, मोठा स्फोट आणि… विमान अपघाताची मोठी कारणे कोणती? मिनिट टू मिनिट अपडेट काय?
Ranchi News : रांची येथून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा चतरा येथे मोठा अपघात झाला, ते क्रॅश झालं. या दुर्दैवी घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात आता मोठी माहिती समोर येत आहे.

झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने टेकऑफ केलेल्या एअर अँब्युलन्सचा काल भीषण अपघात झाला. 23 फेब्रुवारी ( सोमवार) रोजी हे विमान झारखंडच्या चतरा जवळ कोसळलं आणि मोठा अपघात झाला. हे विमान दिल्लीला जाण्यासाठी निघालं होतं. मात्र टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत हे विमान खाली कोसळलं. या विमानात असलेल्या 7ही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांची येथून दिल्लीला जाणाऱ्या या एअर अँब्युलन्समध्ये 2 क्रू मेंबर्स आणि 5 प्रवासी असे एकूण 7 जण होते. या विमानाने रांची येथून साधारण 7 वाजून 11 मिनिटांनी टेकऑफ केलं. पण काही क्षणात संपर्क तुटला. नंतर समोर आली ती विमान क्रॅश होऊन भीषण अपघाताची बातमी. विमानातील सातही प्रवाशांनी जीव गमावला.
मृतांची ओळख आणि तपशील
विमानातील सर्व सातही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असं एसडीपीओ शुभम खंडेलवाल म्हणाले. त्यांची ओळख खालीलप्रमाणे :
1) कॅप्टन विवेक विकास भगत
2) कॅप्टन सवराजदीप सिंह
3) संजय कुमार
4) डॉ. विकास कुमार गुप्ता
5) सचिन कुमार मिश्रा
6) अर्चना देवी
7) धुरु कुमार
अपघातग्रस्त विमानात एकूण 7 प्रवासी होते, त्यामध्ये एक रूग्ण, एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, दोन अटेंडंट , एक पायलट आणि दुसरा को-पायलट . रांचीहून 7 च्या सुमारास निघालेलं हे विमान दिल्लीत 10 वाजता लँड होणं अपेक्षित होतं, मात्र संध्याकाळी 7 वाजून 34 मिनिटांच्या आसपास विमानाचा एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्कच तुटला.
घनदाट जंगलात क्रॅश
रांची विमानतळ संचालक कुमार यांनी दिलेल्या माहितीानुसार,हे संध्याकाळी 7:11 ला उड्डाण केल्यानंतर चतरा जिल्ह्यातील कर्माटंड गावाजवळील जंगलात हे विमान कोसळलं. आयएएनएसच्या वृत्तानुसार, विमान कोसळताच तेथील स्थानिकांनी प्रचंड मोठा आवाज ऐकला, धुराचे मोठे लोटही दिसले. त्यानंतर या अपघाताची माहिती मिळताच, प्रशासन आणि पोलिसांची पथकं घटनास्थळी पोहोचली. रडार डेटा आणि विमानाचे शेवटचे ज्ञात स्थान यांच्या आधारे शोध मोहीम सुरू करण्यात आली, परंतु घनदाट जंगल आणि कठीण भूभाग यामुळे बचाव प्रयत्नांमध्ये अडथळा येत होता.
तपास आणि बचाव मोहीम
या अपघाताचा DGCA कडून (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) आणि इतर नागरी विमान वाहतूक संस्थाकडून सक्रियपणे तपास सुरू आहे. तसेच घटनास्थळी शोध आणि बचाव पथकाचेही कार्य सुरू होतं. सविस्तर तपासासाठी AAIB पथकही पाठवण्यात आलं. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके संयुक्तपणे या कारवाईत सहभागी झाली. .
अपघाताचे कारण काय ?
मात्र टेकऑफ करताच अवघ्या काही वेळात या विमानाचा संपर्क तुटला, नंतर ते कसं कोसळलं, त्याचा अपघात कसा झाला, ही दुर्घटना नेमकी कशी घडली यामागची कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. सविस्तर चौकशीनंतरच अधिकृत माहिती सामायिक केली जाईल. नागरी विमान वाहतूक आणि सुरक्षा संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील येथील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
“23 फेब्रुवारी रोजी, रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट सी90 विमान व्हीटी-एजेव्ही, रांची-दिल्ली सेक्टरवर वैद्यकीय इव्हॅक्युएशन (एअर अँम्ब्युलन्स) उड्डाण सुरू होतं. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कासारिया पंचायत येथे ते कोसळले. विमानात दोन क्रू मेंबर्ससह सात जण होते”, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
कोलकात्याशी कम्युनिकेशन आणि रडार संपर्क तुटला
राजधानी दिल्लीला निघालेल्या या विमानाने 7वाजून 11 मिनिटांनी टेकऑफ केलं. कोलकात्याशी संपर्क साधल्यानंतर, 7 वाजून 34 मिनिटांनी या विमानाचा वाराणसीच्या आग्नेयेस सुमारे 100 एनएम अंतरावर कोलकात्याशी संपर्क आणि रडार संपर्क तुटला. हे रांचीहून दिल्लीला जाणारे (दिल्लीच्या रेडबर्ड एअरवेजद्वारे संचालित) बीचक्राफ्ट किंग एअर (BE9L) चे वैद्यकीय चार्टर विमान होते. नागरी विमान वाहतूक विभाग आणि सुरक्षा संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या अपघाताचे नेमके कारण अज्ञात आहे. मात्र सविस्तर चौकशीनंतरच या अपघाताची अधिकृत माहिती उघड होईल.
