भारतात राहण्याची लाज वाटते… बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; भाजपने थेट…

Politics : देशातील एका बड्या नेत्याने भारतात राहण्याची लाज वाटते असं विधान केलं आहे. त्यानंतर आता भाजपने यावर उत्तर देत सडकून टीका केली आहे.

भारतात राहण्याची लाज वाटते... बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; भाजपने थेट...
kapil sibbal controvercial statement
Image Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 7:39 PM

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी धक्कादायक विधान केले आहे. बंगालमधील खासदारावर झालेल्या हल्ल्यावर बोलताना त्यांनी, भारतात राहण्याची लाज वाटते असं त्यांनी म्हटलं आहे. सिब्बल यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजपने म्हटले की, सिब्बल हे याच देशाच्या सर्वोच्च न्यायालयातून कोट्यवधी रुपये कमावतात आणि त्याच देशाबद्दल लाज वाटत असल्याचे म्हणत आहेत. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला आणि शेकडो लोक मारले गेले, तेव्हा सिब्बल गप्प का होते, असा सवालही भाजपने उपस्थित केला.

पश्चिम बंगालमधील टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर कपिल सिब्बल यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली होती. सिब्बल यांनी म्हटले होते की, ‘ज्या देशात सत्ताधारी पक्ष लोकशाहीच्या मुळांवर घाव घालण्यासाठी कोणतीही पद्धत वापरतो, त्या देशात राहून मला लाज वाटते.’ सिब्बल यांच्या विधानाचा रोख थेट भाजपकडे असल्याचे मानले गेले. त्यानंतर आता भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने काय म्हटले?

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी सिब्बल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. पहिला प्रश्न त्यांनी सिब्बल यांच्या कमाईबाबत उपस्थित केला. पुनावाला यांनी म्हटले की, ‘सिब्बल हे याच देशाच्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करून कोट्यवधी रुपये कमावतात, तरीही त्यांना या देशात राहणे लाजिरवाणे वाटते.’ पुढे बोलताना पुनानाला म्हणाले की, 2021 मध्ये पश्चिम बंगाल हिंसाचारावर होता. त्यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या 300 हून अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा कपिल सिब्बल हे एक शब्दही बोलले नाहीत. तसेच इतर प्रकरणांवरही ते शांत होते.

शहजाद पुनावाला यांनी पुढे बोलताना विरोधकांच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपचा विरोध करणे वेगळे आहे, पण देशाचा विरोध करणे हे वेगळे आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण देशाविषयी द्वेष का? असा सवाल त्यांनी केला. पुढे पूनावाला यांनी राहुल गांधी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्याच्या शौर्यावरही प्रश्न उपस्थित केले होते.

अभिषेक बॅनर्जी प्रकरणावर भाजपने काय म्हटले?

अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पूनावाला म्हणाले की, ‘या घटनेचे समर्थन कोणीही करत नाही. मात्र या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही लोकांचे संबंध तृणमूल काँग्रेसशीच आहेत. बहुतांश विरोधी नेत्यांनी या हल्ल्याचा उघडपणे निषेध केलेला नाही. हा तृणमूल काँग्रेसचा अंतर्गत वाद आहे.’

Follow Us