त्या चार घटनांनी सर्वच चक्रावले, काय घडतंय पडद्यामागे? भाजप आणि पवार गटात काय खिचडी शिजतेय?
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शरद पवार गटातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या भेटीगाठी, पवारांची मोदींसोबतची चर्चा, खासदारांचे भेटीसत्र आणि खासगी कार्यक्रमांतील उपस्थिती या चार घटनांनी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पडद्यामागे काही मोठे राजकीय घडामोडी घडत आहेत का, याची उत्तरे अजून गुलदस्त्यात असली तरी, चर्चांना मात्र जोर धरला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार गट आमि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे. या भेटीगाठी आणि घटनाक्रमांमुळे राजकीय वर्तुळात नव्य नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ तर येणार तर नाही ना? असे संकेतच या भेटीतून मिळत आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांकडून किंवा पक्षाच्या एखाद्या नेत्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा वा भाष्य करण्यात आलेलं नाही. पण ज्या घटनांमुळे चर्चांचा बाजार गरम झाला आहे, त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.
पहिली घटना – पवार-मोदी भेट
जंतरमंतरवर आंदोलन सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. खासकरून जंतरमंतरवरील आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीट परीक्षेतील घोटाळ्यांबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही या भेटीत चर्चा झाली. पवार गटाकडून तसं सांगण्यातही आलं. मात्र, शरद पवार हे मोदींना भेटल्यावर राजकीय चर्चा होणार नाही? आणि या भेटीवरून वेगवेगळे कयास वर्तवले जाणार नाहीत, असं होऊ शकत नाही. त्यामुळे यावेळीही कयास उडाले आणि या भेटीकडेही राजकारणाच्या चष्म्यातून पाहिलं गेलं. महाराष्ट्रातील राजकारणात नवीन समीकरणे होण्याचे कयासही या भेटीनंतर वर्तवले गेले.
दुसरी घटना – पवारांचे 8 खासदार मोदींच्या भेटीला
ठाकरे गट आणि तृणमूल काँग्रेसचे फुटीर खासदार पंतप्रधानांना भेटल्यानंतर लगेच दोन दिवसात पवार गटाचे 8 खासदार मोदींना भेटले. यावेळी महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा झाली. पण भेटीच्या टायमिंगमुळे या भेटीकडेही राजकीय चष्म्यातून पाहिलं गेलं.
तिसरी घटना- रेवतीच्या वेडिंग रिसेप्शनचं निमित्त
सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिच्या लग्नाचं रिसेप्शन दिल्लीत आयोजित केलं होतं. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहिले होते. वेगवेगळ्या पक्षाचे नेते या रिसेप्शनला आले. त्यांच्या भेटीगाठी झाल्या. या सोहळ्यात पवार आणि मोदी एकत्रच होते. त्यामुळेही भलेरही घरगुती समारंभ असला तरी भेटीगाठीची राजकीय चर्चा रंगली.
चौथी घटना – सुप्रिया सुळे आणि तावडेंचा एकत्र प्रवास
दिल्लीत सुप्रिया सुळे आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी एकाच कारमधून प्रवास केला. त्याचा व्हिडीओही समोर आला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. भाजप आणि पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राजकीय प्लान?
या चारही घटनाक्रम पाहता पवार गट आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी केवळ औपाचारिक भेटी आहेत की त्याला काही राजकीय अर्थ आहे वा यामागे एखादा मोठा राजकीय प्लान आहे का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. दोन्ही पक्ष सोबत येणार असल्याच्या महाराष्ट्रात नेहमी चर्चा असतात. त्यात या भेटींनी त्याला अधिकच खतपाणी घातलं आहे. मात्र, यावर दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात पवार गट आणि भाजपसोबत येण्याचा अफवांचा बाजार तेज झाला आहे.