तृणमूलचे 59 आमदार फूटणार? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय, बंगालच्या राजकारणात भूकंप!
ममता बॅनर्जी यांच्या 80 आमदारांपैकी 59 आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या पाठीमागे राहण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य फूट लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनीही मोठं पाऊल उचललं आहे.

TMC MLA Revolt : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा या दोन आमदारांना पक्षातून काढलं आहे. त्यानंतर जवळपास ५९ पेक्षा जास्त आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजपादेखील अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते तथा बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत तृणमूलच्या 18 आमदारांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे आता तृणमूलची शकलं करण्यासाठी भाजपादेखील सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी हावडा आणि दक्षिण 24 परगाणा या दोन भागांची एक प्रशासकीय बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण तृणमूल काँग्रेसच्या 18 आमदारांनी हजेरी लावली. या बैठकीत जावेद खान, फिरहाद हकीम, नयना दास बॅनर्जीक, कुणाल घोष, ऋतब्रत बॅनर्जी, संदीपन साहा, अशोक देव, अरुणाभा सेन, समीर पांजा, प्रिया पाल, गुलशन मल्लिक, तपस मैती, नीलिमा मिस्त्री, अब्दुल खालेक मोल्लाह, बहारुल इस्लाम परेशराम दास, जॉयदेव हलदर, समीर जाना, या आमदारांनी सुवेंदू अधिकारी यांच्या बैठकीत हजेरी लावली.
ममता बॅनर्जी यांनी घेतला मोठा निर्णय?
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या 80 आमदारांपैकी 59 आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या पाठीमागे राहण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य फूट लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनीही मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी पक्षातील सर्व समित्या आणि इतर संघटना बरखास्त केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने मोठ्या विचाराअंती पक्षाच्या सर्व संघटना, त्यावरील नियुक्त्या बरखास्त केल्या आहेत, असे सांगितले आहे. लवकरच आम्ही र्वसमावेशक आत्मपरीक्षण, कामगिरीचा आढावा आणि संघटनात्मक मूल्यांकन करू आणि संघटनांची पुनर्रचना करू, असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय घेऊन आता ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे सर्व अधिकार आपल्याकडेच घेतल्याचे बोलेल जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.