युरोपातील राजाला आंबा निर्यात करायचा कसा? या धडपडीतून ‘हापूस’चा असा शोध लागला

हापूस आंबा आवडत नाही असा माणूस विरळच. आंब्याचे हजारो प्रकार देशभरात पिकतात. परंतू कोकणातील देवगड आणि रत्नागिरीच्या हापूसच्या चवीला दुसरा पर्याय नाही. परंतू आंब्याचे हे वाण विकसित होण्यामागची स्टोरी मजेशीर आहे. आंब्याच्या व्यापाऱ्यातून आंब्याची निर्यात करताना हापूसचा शोध लागला हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्यापासून राहणार नाही.

युरोपातील राजाला आंबा निर्यात करायचा कसा? या धडपडीतून 'हापूस'चा असा शोध लागला
Alfonso de Albuquerque हापूस आंब्याच्या शोधाची कहाणी Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 3:53 PM

आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंब्यामध्ये अनेक प्रकार असले तरी हापूस आंबा चवीला अंत्यत गोड आणि सुमधूर लागतो. दूरुनही तो त्याच्या सुंगधाने आपली दखल घ्यायला लावतो. वास्तविक पाहाता, उन्हाळ्यात मार्च-एप्रिल महिन्यात आंब्याच्या पेट्या बाजारात येऊ लागतात. परंतू त्याआधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातही आंब्याच्या पेट्या बाजारात पहिली पेटी म्हणून दाखल होतात. हापूस किंवा अल्फान्सोला सर्वात जास्त मागणी असते. सुरुवातीला बहुतेकांच्या आवाक्या बाहेर असलेल्या या आंब्यांना सोन्यासारखा भाव असतो. यंदा जानेवारी महिन्यात पुण्याच्या बाजारात दाखल झालेल्या आंब्याने चक्क 440 रुपये प्रति नग भाव गाठला होता. खरेतर अल्फान्सो या शब्दाचे अपभ्रंश म्हणून हापूस हा शब्द निर्माण झाला आहे. अल्फान्सो आंबा म्हणजेच आपल्या मराठीत हापूस आंबा होय. या हापूसच्या आंब्याची कहाणी मोठी मनोरंजक आहे.

अल्फान्सो डी अल्बुकर्क हा पोर्तूगिजांचा सेनानी होता. अल्फान्सो डी अल्बुकर्क यांचा जन्म 1453 मध्ये पोर्तुगालमधील लिस्बनजवळील अलहंद्रा येथे झाला. तो सहा वर्षे पोर्तुगिजांचा भारतातील दुसरा गव्हर्नर होता. संपूर्ण हिंद महासागर ओलांडून पोर्तुगीजांच्या सत्तेचा विस्तार करण्यासाठी त्याला ओळखले जाते. आणि एक क्रुर आणि कुशल लष्करी कमांडर म्हणून त्याची ख्याती होती. अल्फान्सो डी अल्बुकर्क भारतातील पोर्तुगाली सत्तेचा व्हाईसरॉय बनला. मलाबार तटावरील गोवा या महत्वपूर्ण बंदराचा 1510 रोजी त्याने ताबा घेतला. त्याने भारतात अनेक पोर्तुगीज वसाहती वसविल्या होत्या. त्यांच्या राज्यात त्याने कोलंबियन फूडची आयात केली. त्याने जगभरात लालमिरची, मका, टोमॅटो आदी फळे आणि भाज्यांचे नवीन प्रकार आणले. त्यावेळी या पोर्तुगीज सेनापतीने आंब्याची देवाण घेवाण करुन आंब्याच्या कोयी पेरुन पाहिल्या. त्याआधी भारतातील आंब्यांच्या जाती मऊ आणि रसाळ होत्या. त्यामुळे त्यांना कापता यायचे नाही आणि चोखावे लागायचे. आंब्यांची निर्यात करताना हे मऊ आणि रसाळ आंबे युरोपात राजाला निर्यात करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या.

आंबे कापून खाता येईना..ही अडचण

सम्राटाला युरोपात टेबलवर ‘कट आणि सर्व्ह’ करता येणारे थोडे जाड गर असलेले पल्पी आंबे हवे होते. त्यामुळे पोर्तुगिजांनी गोव्यातील आंब्यांच्या झाडांवर कलम करण्याचे विविध प्रयोग सुरु केले. अशा प्रकारे पोर्तुगिज मिशनऱ्यांना या नव्या आंब्याचा शोध लागला. जेसुईट मिशनऱ्यांनी त्यावेळी आंब्याच्या या नवीन जातीची लागवड कोकण किनारपट्टीवर केली, या आंब्याला सेनापती अल्फान्सो यांचे नाव देण्यात आले. म्हणजे भारतातील उन्हाळ्यात पिकणाऱ्या आंब्याला दूरवर युरोपात राजाला निर्यात करण्यासाठी आणि तो जास्त वेळ टीकावा, तसेच डीशमध्ये नीट कापून सर्व्ह करता यावा. राजाला तो नीट खाता यावा या प्रयत्नात हापूस आंब्याचे हे नवीन वाण जन्माला आले. देवगड, रत्नागिरी येथील हापूस दोन्हींकडील कातळ, माती आणि हवामानामुळे आंब्याला नवी चव मिळाल्याचे म्हटले जाते.

हापूसची पारख कशी करावी?

देवगड आणि रत्नागिरीचा हापूस आंबा हा सगळ्यात प्रतिष्ठीत मानला जातो. देवगडचा हापूस आंब्याला जीओ टॅग मिळालेले आहे ! देवगड हापूस घरात असेल तर त्याचा सुगंध लपून राहत नाही. त्यामुळे आंबा आणल्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. तर बाजारातून आंबा खरेदी करताना तो नाकाला लावून सुंगध घेण्याची काही गरज नसते. नुसता हातात घेतला तरी त्याचा सुगंध आपल्याला आला पाहिजे ही हापूस आंब्याची खरी ओळख आहे.

संपूर्ण पिवळा आंबा देखील हापूस नाही

संपूर्ण फळ एकसारखेच पिवळे असेल तर तो आंबा हापूस नाही हे बिनदिक्कत समजावे. असा आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला नसतो. असा आंबा वरून जरी पिवळा जार दिसत असला तरी कापल्यानंतर आतून तो पांढरा आणि चवीला आंबट असतो. त्यामुळे हिरवट, पिवळट थोडासा केशरी शेड असलेला आंबा हापूस जातीचा असण्याची शक्यता जास्त असते. जादा लाल केशरी रंगाचा आंबा झाडाच्या टोकाच्या शेंड्या जवळचा, पूर्व दिशेच्या फांद्यांवरचा असतो. त्या अधिक सुर्यप्रकाश त्याला  मिळाल्याने त्याला असा आकर्षक लाल रंग येतो. त्याच्या गालावर एकप्रकारची लाली आल्यासारखी दिसते. पण असा आंबा जास्त ऊन खाल्यामुळे ‘लासा’ निघण्याचाही धोका असतो असे जाणकार म्हणतात.

आंबा विकत घेताना हे पाहा

हापूस आंबा ओळखण्याची आणखी एक पद्धत म्हणजे हे सगळं पाहण्यापेक्षा आंबा देठाकडून आत खेचला गेलेला आहे ना याची खात्री करावी. तोच खरा हापूस आंबा. गवतात ठेवा अगर नका ठेवू असा आंबा हमखास पिकणारच ! देवगड हापूस आतून देखील केशरीच निघतो. रत्नागिरीचा हापूस पिवळा असतो. तर कातळावराचा केशरी रंगाचा असतो, मातीतला पिवळा, देवगड आंबा हा आकाराने जास्त गोलाकार तर रत्नागिरी हापूस आकाराने लांबट मोठा असतो, कातळावरचा आंबा चवीला देखील खुपच मधूर लागतो.

जास्त मोठे फळ नका घेऊ

हापूस विकत घेताना जास्त मोठं फळ घेण्याच्या भानगडीत सहसा पडू नका. कारण आकाराने मोठे फळ चवीला कमी गोड, भाव जास्त, खराब निघण्याची शक्यताच अधिक जास्त असते. त्यामुळे जास्त गर मिळण्याच्या आशेने मोठ्या आकाराचा हापूस कोणी विकत देत असेल तर जास्त फळे घेण्याच्या भानगडीत पडू नये असे जाणकार सांगतात.

कर्नाटकचा हापूस

देवगड हापूसची साल एकदम पातळ असते तसेच गरात तंतुमय दोरे जवळपास नसतातच. कर्नाटकी आंब्याच्या गरात कोयीला जास्त तंतुमय दोरे जास्त असतात. रत्नागिरीच्या हापूस आंब्याची साल देवगडच्या हापूस पेक्षा थोडी जाड असते. आता ओरिजनल देवगड हापूस आंबे आपल्या पर्यंत येतच नाहीत असे म्हटले जाते. ते परदेशातच निर्यात केले जातात. त्यामुळे आपल्या येथे डोक्यावर पेट्या घेऊन विकणारे लोक कर्नाटकचे हापूस रत्नागिरी किंवा देवगड सांगून विकतात.

आंब्यामुळे शरीराला फायदे

आंब्यामुळे हिमोग्लोबिन चांगलेच वाढते. इतरही पोषक द्रव्ये विपुल प्रमाणात मिळतात. आंब्यांमुळे वजन देखील वाढते. आंबा हे फळ गोड असल्याने डायबिटीज असलेल्या लोकांना जास्त खाऊ नये असे म्हटले जाते. तरीही डॉक्टरांना विचारुन एखादे फळ खाल्ले तरी काही हरकत नाही.

आंबा वर्षभर मिळण्यासाठी?

आंबा साठ, आटवलेला रस, पॅक आमरस या स्वरूपात वर्षभर खाता येतो. चांगला पिकलेला पण मऊ न झालेल्या आंब्याची साल आणि कोय काढून  त्याच्या  गराच्या फोडी घट्ट झाकणाच्या डब्यात भरून डिप फ्रिझरमध्ये ठेवून द्यायच्या आणि त्यामुळे सिझन संपल्यावर देखील पुढे तीन चार महिने आंंबाच्या फोडी खाण्याचा आनंद घेता येतो. पण एकदा का फोडी बाहेर काढल्या की त्याच दिवशी संपवून टाकाव्यात. त्यासाठी मग एकच मोठा डबा घेण्यापेक्षा अधिक छोटे डबे वापरुन एकावेळी संपूर्ण फोडी संपवा आणि बेमोसमी आंबे खाण्याचा आनंद लुटा !

विकत घेताना काय कराल

आंबा विकत घेताना एकदम पाच सहा डझन आणू नका. कारण आंबा चांगला निघाला नाही तर सगळेच मुसळ केरात जाईल. तसेच चांगला असेल तर खाऊन संपवायची पण घाई देखील करावी लागले. त्यामुळे एका वेळी एक डझन विकत घ्या. आणि काळानूसार उतरणाऱ्या किमतीचा लाभ मिळून बचत होईल आणि आणलेल्या आंब्यावर सुरकुत्या पडायच्या आत त्याचा तजेला तुकतुकी जायच्या आता खाऊन संपवा.

देवगड हापूस आंब्याला जिओ टॅग

साल 2010 मध्ये, देवगड हापूस आंब्याला भारत सरकारने भौगोलिक संकेत जीआय टॅग प्रदान केला आहे. GI टॅग हे एक प्रमाण आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातून उत्पन्‍न झालेल्‍या उत्‍पादनाची ओळख ते प्रदान करते, जिथं त्‍याची अद्वितीय गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा इतर वैशिष्‍ट्ये आहेत जी त्याच्या भौगोलिक उत्पत्तीशी जोडली असतात. GI टॅग असे सुनिश्चित करतो की उत्पादन अस्सल आणि विशिष्ट मानक आणि दर्जाचे आहे. देवगड हापूस आंब्यासाठी GI टॅग मिळाल्याने विविध प्रदेशातील इतर उत्पादकांकडून अनुकरण, डुप्लिकेशन किंवा नावाचा दुरुपयोग यापासून फळ आणि उत्पादकांना कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हापूस आंब्याची गुणवत्ता आणि वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्यांच्यासाठी हा टॅग एक महत्त्वाची ओळख बनला आहे.

देवगडचा आंबा निर्यात होतो

GI टॅगमुळे हापूस आंब्याच्या उत्पादनाला भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार आणि व्यापार करण्यातसाठी मदत झाली आहे, ज्यामुळे फळांची मागणी वाढली आणि किंमती वाढल्या. याचा शेतकऱ्यांच्या जीवनमानावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. देवगडच्या हापूस आंब्यासारखीच अनोखी चव जगात कुठेच मिळत नाही याचे दुसरे एक कारण म्हणजे अनुकूल वातावरण आणि देवगड तालुक्याच्या जमिनीमध्ये सापडणारे मातीतील खनिज. या मातीतील वाढलेली झाडे ज्या प्रकारचा आंबा पिकवतात तो आंबा आणि चव ही जगामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही.

आंतरराष्ट्रीय मागणी

हापूस आंबा त्याच्या अद्वितीय चव, सुगंध आणि पोत यासाठी ओळखला जातो. हा जगातील सर्वोत्तम आंब्याच्या जातींपैकी एक मानला जातो आणि भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला जास्त मागणी आहे. भारतातील आंब्याचा हंगाम साधारणपणे एप्रिलमध्ये सुरू होतो आणि जूनपर्यंत चालतो, या काळात हापूस आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो.

कुठे कुठे होते निर्यात

आज हापूस आंबा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसह भारतातील अनेक भागांमध्ये पिकवला जातो. हापूस आंबे अमेरिका, युनायटेड किंगडम आणि मध्य पूर्वेसह अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात तथापि, अलिकडच्या वर्षांत आंब्याला कीटक, रोग आणि प्रदुषण तसेच हवामानातील बदल यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्याच्या उत्पादन आणि गुणवत्तेवर देखील परिणाम झाला आहे.

चवीत आदर्श

देवगडचा हापूस आंबा आपल्या अनोखा दर्जा, रंग सुगंध आणि अवीट गोड चवीसाठी ओळखला जातो. हे एक नाजूक, समधुर गर असलेले असलेले गोड फळ आहे आणि त्याला एक वेगळाच सुगंध आहे. ज्यामुळे ते आंब्याच्या इतर जातींपेक्षा वेगळे अद्वितीय ठरले आहे.

विशिष्ट हवामान

महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड येथे हापूस आंब्यासाठी आदर्श असलेली माती, हवामान आणि भौगोलिक स्थिती यांचा एक अद्वितीय संयोजन आहे. येथील माती विविध खनिजांनी समृद्ध आहे, आणि प्रदेशात नियमित पर्जन्यमानासह उबदार आणि दमट हवामान आहे, जे आंबा लागवडीसाठी अतिशय योग्य आहे.

मर्यादित सिझन

देवगड हापूस आंबा दरवर्षी मर्यादित कालावधीसाठी, एप्रिल ते जूनपर्यंत उपलब्ध असतो. यामुळे हे फळ अत्यंत मौल्यवान बनते आणि जगभरातील आंबा प्रेमींनी त्याची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त, या प्रदेशाची उत्पादन क्षमता मर्यादित आहे, ज्यामुळे फळांच्या विशिष्ट्यांमध्ये भर पडते.

खास काळजी

देवगडच्या हापूस आंब्यांच्या झाडांची वर्षभर शेतकरी काळजीपूर्वक लागवड करतात. केवळ उत्तम दर्जाची फळे निवडली जातील याची काळजी घेतात. खतांचा वापर, लागवड आणि काढणी तसेच पॅकिंग काळजीने केल्यास उत्तम गुणवत्तेचे फळ मिळते.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.