विद्ध्वंस नव्हे, स्वाभिमानाची गाथा ! 1000 वर्षांचा अढळ विश्वास – पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाला, त्या घटनेला आज 1 हजार वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराबद्दल लेख लिहीत या इतिहासाला उजाळा दिला. परकीय आक्रमकांनी मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु सोमनाथ अढळ राहिलं. हे ज्योतिर्लिंग भारताच्या आत्म्याचे प्रतीक आहे असं त्यांनी नमूद केलं.

सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला 1 हजार वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi) यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक लेख शेअर केला आहे. त्यात त्यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या वैभवाबद्दल लिहीलं आहे. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रभास पाटण येथे ते असल्याचे त्यांनी नमूद केलं. सोमनाथ हे भारताच्या आत्म्याचा शाश्वत अवतार आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रममध्ये सोमनाथसह भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी लिहीलं.
कोट्यवधी लोकांची श्रद्धा आणि प्रार्थनेचं केंद्र असलेल्या सोमनाथ मंदिराला परकीय आक्रमकांनी लक्ष्य केलं, असं पीएम मोदी यांनी लिहीलं. हे धार्मिक स्थळ पूर्णपणे नष्ट करण्यावर त्यांचं संपूर्ण लक्ष होतं. 2026 हे वर्ष सोमनाथ मंदिरासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण ते या महान तीर्थक्षेत्रावरील पहिल्या हल्ला झाल्याच्या घटनेला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत, असं पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलं.
जानेवारी 1026मध्ये गझनीच्या महमूदने या मंदिरावर मोठा हल्ला केला, हे मंदिर उद्ध्वस्त केलं, असं त्यांनी नमूद केलं. श्रद्धा आणि सभ्यतेचे एक महान प्रतीक नष्ट करणं हाच या क्रूर आणि हिंसक हल्ल्याचा उद्देश होता.
Jai Somnath!
2026 marks 1000 years since the first attack on Somnath took place. Despite repeated attacks subsequently, Somnath stands tall! This is because Somnath’s story is about the unbreakable courage of countless children of Bharat Mata who protected our culture and…
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2026
पुनर्बांधणीचे प्रयत्न सुरू
या लेखात पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलं की, सोमनाथ मंदिरावरील हल्ला हा मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक आहे. तरीही, 1 हजार वर्षांनंतरही, मंदिर अजूनही पूर्ण वैभवात उभे आहे. 1026 सालानंतर, या मंदिराची पूर्ण वैभवात पुनर्बांधणी करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न सुरू राहिले.
मंदिराचे सध्याचे जे स्वरूप आहे, ते 1951 साली आकारास आले. योगायोगाने, 2026 हे वर्ष सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचे 75 वर्ष देखील आहे. 11 मे 1951 साली या मंदिराची पुनर्बांधणी झाली होती. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक समारंभात मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडण्यात आले होते.
कोट्यवधी संतांच्या स्वाभिमानाची गाथा
“त्या काळात भारतावर आणि तिथल्या लोकांच्या मनोबलावर याचा किती खोलवर परिणाम झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो का ? “असा सवाल या लेखात पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला. ” सोमनाथ मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप होते. ते मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करत असे. ही एक मजबूत आर्थिक क्षमता असलेल्या समाजाची प्रेरणा होती. आपले सागरी व्यापारी आणि खलाशी यांच्यामुळे त्याच्या वैभवाच्या कहाण्या दूरपर्यंत पसरल्या होत्या,” असं त्यांनी पुढे नमूद केलं.
सोमनाथ मंदिरावरील हल्ला आणि नंतर गुलामगिरीचा दीर्घ काळ असूनही, आज मी पूर्ण आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगू इच्छितो की सोमनाथची कहाणी ही विनाशाची कहाणी नाही. ही भारतमातेच्या कोट्यवधी मुलांची स्वाभिमानाची गाथा आहे जी गेल्या 1000 वर्षांपासून चालत आली आहे, ही आपल्या, भारतातील लोकांच्या अढळ श्रद्धेची गाथा आहे असंही त्यांनी यामध्ये लिहीलं आहे.
आपल्या संस्कृतीची सखोल समज
दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरे आणि गुजरातमधील सोमनाथसारखी मंदिरं तुम्हाला ज्ञानाचे असंख्य धडे शिकवतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ते तुम्हाला आपल्या संस्कृतीची सखोल समज देतात, तुम्ही जी पुस्तकं वाचली असतील, त्या कोणत्याही पुस्तकांपेक्षा ते तुम्हाला अधिक खोलवर समज देतील.
या मंदिरांवर आक्रमणांच्या शेकडो खुणा आहेत आणि शेकडो वेळा त्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. ती (मंदिरं) वारंवार नष्च करण्यात आली. पण प्रत्येक वेळी, ती मंदिर स्वतःच्या (भग्न) अवशेषांमधून आधीपेक्षा जास्त मजबूत होऊन पुन्हा उभी राहिली. हीच राष्ट्रीय भावना आहे, हीच राष्ट्रीय जीवनशक्ती आहे. त्याचे अनुसरण केल्याने आपल्याला अभिमान वाटतो असं पंतप्रधानांन आपल्या लेखात नमूद केलं.
