गरीब कल्याण, विकास अन् सुशासन; मध्यमवर्गीयांसाठी एनडीए दिवसरात्र काम करणार – PM मोदी
PM Modi : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनडीएच्या नेत्यांचा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी NDA च्या आगामी व्हिजनबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सेवा देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम तोडला. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनडीएच्या नेत्यांचा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मोदींनी ‘जनता जनार्दन माझ्यासाठी ईश्वराचे रूप आहे. मध्यमवर्गीयांना मागे पडू द्यायचे नाही. त्यासाठी आपल्याला रात्रंदिवस काम करावे लागेल. जनतेने आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या आम्ही नक्की पूर्ण करू.’ असं म्हणत एनडीएने केलेल्या कामांची माहिती दिली.
जनतेने एनडीएवर विश्वास दाखवला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘काँग्रेसच्या विश्वासघातानंतर देशातील जनतेने एनडीएवर विश्वास दाखवला आणि आमच्या आघाडीने त्या विश्वासाला अधिक बळकट करण्याचे काम केले आहे. मला समाधान आणि अभिमान वाटतो की, एनडीएने एक कुटुंब म्हणून देशाचा विश्वास नेहमीच दृढ केला आहे. 2014 मध्ये आशेचा जो सूर्योदय झाला होता, तो आज नव्या आत्मविश्वासाच्या किरणांमध्ये परिवर्तित झाला आहे.’
25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘एनडीए सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात 25 कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हे सरकारच्या धोरणांची दिशा आणि उद्दिष्टे योग्य असल्याचा ठोस पुरावा आहे. एनडीए सरकारचे लक्ष नेहमीच गरीब कल्याण, विकास आणि सुशासन यावर केंद्रित राहिले आहे. याच कारणामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास सातत्याने वाढत गेला आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एनडीए सरकार यापुढेही त्याच निर्धाराने आणि समर्पणाने काम करत राहील.’
पूर्वीची व्यवस्था आणि आताच्या व्यवस्थेत फरक
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, जर गेल्या 12 वर्षांत इतकी मोठी कामगिरी करता येत असेल, तर त्याआधीच्या अनेक दशकांत ती का झाली नाही? यातूनच काँग्रेसच्या काळातील विकासदर आणि एनडीएच्या काळातील विकासदरातील फरक स्पष्टपणे दिसून येतो. पूर्वीची व्यवस्था लोकांना फक्त प्रतीक्षा करायला लावत होती, तर आजची व्यवस्था प्रत्यक्ष परिणाम देत आहे. पूर्वी एक अशी व्यवस्था होती जी कामे अडकवत आणि भरकटवत होती. मात्र आजची व्यवस्था कामे वेळेत आणि मोठ्या प्रमाणावर पूर्ण होतील, याची खात्री करते. हा त्या भारताचा प्रवास आहे, ज्याने पहिल्यांदाच आपल्या संपूर्ण क्षमतेने धावण्यास सुरुवात केली आहे.’.
विकसित भारत हा 140 जनतेचा राष्ट्रीय संकल्प
पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या 12 वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि जलद निर्णयक्षमतेचा नवा अध्याय अनुभवला आहे. विकसित भारताचा संकल्प हा केवळ सरकारचा कार्यक्रम नाही. तो आज 140 कोटी भारतीयांचा राष्ट्रीय संकल्प बनला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार आणि जनता एकत्रितपणे पुढे जात आहेत.’