PM नरेंद्र मोदींनी BRICS Summit च्या मंचावरून दिला मोठा संदेश; खनिज -तंत्रज्ञानावर महत्त्वाचं बोलले
PM नरेंद्र मोदींनी BRICS Summit च्या मंचावरून दिला मोठा संदेश दिला आहे. त्यांनी यावेळी तंत्रज्ञानावर महत्वाचं भाष्य केलं.

भारताची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिषदेत तंत्रज्ञान आणि खजिन्यासंदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं. तंत्रज्ञान आणि अत्यावश्यक खजिन्याचं रुपांतर शस्त्र म्हणून केल्यास ब्रिक्स राष्ट्राच्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो. खरंतर तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेतलं पाहिजे, असा संदेश पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स राष्ट्रांना दिला.
तंत्रज्ञान सर्व देशांपर्यंत पोहोचलं पाहिजे – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटलं की, भारताच्या ब्रिक्सच्या अध्यक्षेतेदरम्यान नावीन्य, सहकार्य इत्यादीवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. या दूरदृष्टीनुसार, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, डिजिटल कृषी सारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘तंत्रज्ञान आणि आवश्यक खनिजांचं रुपांतर शस्त्र म्हणून केल्याने प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. ब्रिक्स देशांनी तंत्रज्ञान स्वीकारताना सर्वसमावेशक दृष्टीकोनावर भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचे फायदे मोजक्या देशांसाठी मर्यादित न ठेवता, शक्य होईल, तितक्या देशांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचेल, यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञानाच्या विकासात ग्लोबल साऊथच्या देशांचा समान सहभाग झाला पाहिजे’.
शेती व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
तंत्रज्ञानाचा वापर आता शेती क्षेत्रातही केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स शिखर परिषदेतही डिजिटल शेती व्यवसायावर महत्त्वाचं भाष्य केलं. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी पुढे सांगितले. आता एआय ,डिजिटल सुविधा शेतकऱ्यांच्या गरजांशी जोडल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी आणि शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदींनी या परिषदेत ब्रिक्स इनक्यूबेटर नेटवर्क आणि स्टार्टअप इनोव्हेशन फंडाचा उल्लेख केला. सदर नेटवर्क हे ब्रिक्स देशातील स्टार्ट्अप्स आणि इनक्यूबेटर्सना जोडण्यासाठी आहे. तसेच मोदींनी ब्रिक्स लॉजिस्टिक्स सप्लाय चेन कोऑपरेशन फ्रेमवर्कचाही उल्लेख केला. यामुळे पुरवठा साखळ्या अधिक विश्वासार्ह आणि मजबूत होतील, असे पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) सांगितले.
