
इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे भारतालाही मोठा फटका बसला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हाने निर्माण झाल्याचं मोदी म्हणाले. एस. जयशंकर आणि हरदीप पुरी यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. या संकटाला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. या संकटातून लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण जगाने आग्रह धरला आहे. या युद्धाने भारतासमोर अचानक समस्या निर्माण केल्या आहेत, असं मोदी म्हणाले. हे संकट लवकर संपलं पाहिजे हा संदेश या सभागृहातून जगातील सर्व देशांना गेला पाहिजे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी युद्धाच्या काळात परदेशातून भारतात सुखरूप परतलेल्या भारतीय नागरिकांवरही भाष्य केलं. प्रत्येक भारतीयाचं संरक्षण हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच युद्धाने होरपळलेल्या देशातील भारतीयांना आम्ही सातत्याने मदत करत आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षावर आणि त्याचा भारतावर होणाऱ्या परिणामावर चर्चा करण्यासाठी या सभागृहात आलो आहे. तेथील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. भारतासमोर या युद्धामुळे संकट उभे राहिले आहे, हे संकट मानवीय, आर्थिक आणि सुरक्षेबाबत आहे. युद्धात सहभागी असलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध आहेत. ज्या भागात युद्ध आहे तिथून भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल मिळते. एक कोटींपेक्षा जास्त भारतीय लोक आखाती देशांमध्ये राहत आहेत. आम्ही हा संघर्ष संपवण्याचे आवाहन करत आहोत.’
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ‘युद्ध सुरू झाल्यापासून या भागातील भारतीयांना मदत करण्याचे काम सुरु आहे. मी संबंदित देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललेलो आहे. काहींचा मृत्यू झाला आहे, काही लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आम्ही शक्य ती मदत देत आहोत. भारतीयांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. युद्धाच्या काळात 3 लाख 75 हजार भारतीय मायदेशी परतले आहे. तसेच इराणमधून 1000 लोक मायदेशी परतले आहेत. सरकार संवेदनशील आणि सतर्क आहे.’
पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, ‘भारत आपल्या गरजेचा 60 टक्के गॅस आयात करतो. भारतात मोठ्या प्रमाणात होर्मुझमधून तेलाची आणि गॅसची जहाजे येतात. भारत सरकार आखाती देशांमधून येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. आम्ही हार्मुझमध्ये अडकलेली अनेक जहाजे सुरक्षित भारतात आणली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इथेनॉल च्या उत्पादनात वाढ झाली आहे, यामुळे इंधन आयातीत थोडी घट झाली आहे. आम्ही LPG चे उत्पादन वाढवले आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर नजर ठेवली जात आहे.’