
इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे इराणसह जगातील अनेक भागातील शिया मुस्लिमांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आता भारतातही खामेनी यांच्या मृत्यूमुळे संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रविवारी जिल्ह्यातील हजारो शिया पुरुष, महिला आणि मुले रस्त्यावर उतरले. यावेळी या लोकांनी खामेनींचे पोस्टर आणि काळे झेंडे घेऊन अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील कल्लू इमामबाडा येथे हजारो लोक जमले आहेत. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. यावेळी गर्दीतून एकच आवाज घुमला, “तुम्ही एका हुसेनीला माराल, तर प्रत्येक घरातून दुसरा बाहेर येईल.” यावेळी या निदर्शकांनी म्हटले की, ही चळवळ एक व्यक्ती शहीद झाल्याने संपणार नाही तर ती आणखी मजबूत होईल.”
प्रसिद्ध शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या या हल्ल्याला “कायर दहशतवादी हल्ला” म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “अयातुल्ला अली खामेनी नेहमीच हौतात्म्यासाठी प्रार्थना करत असत आणि लढताना ते शहीद झाले. आपल्या धर्मात शहीद होणे हे सर्वोच्च स्थान आहे. खामेनींचे रक्त व्यर्थ जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी खमेनींना शहीद केलेले नाही, तर त्यांनी स्वतःच्या मृत्युदंडाच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली आहे. त्यांचे मृत्यू अत्यंत दुःखद असतील.”
मौलाना कल्बे जवाद यांनी देशभरातील शिया मुस्लिम समुदायाला तीन दिवसांचा शोक पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांना लोकांना आपली दुकाने आणि व्यवसाय स्वेच्छेने बंद ठेवण्यासही सांगितले आहे. त्याचबरोबर देशभरात एकाच वेळी शोक सभा आणि कँन्डल मार्च आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर घरांवर काळे झेंडे फडकावून निषेध नोंदवण्यात यावा असंही त्यांनी म्हटले आहे.
जौनपूरमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे पोलिस आणि प्रशासन पूर्ण सतर्क आहे. कल्लू इमामबाडा आणि संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.