रील्समधील तोकड्या कपड्यांची संसदेत चर्चा; सपाच्या खासदाराकडून मुद्दा उपस्थित
MP Ram Gopal Yadav on Reels : राम गोपाल यादव यांनी राज्यसभेत बोलताना रील्सचा मुद्दा उपस्थित केला. रील्सच्या मुद्द्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही रील्स पाहून नजर झुकवावी लागते, असं राम गोपाल यादव म्हणाले. राज्यसभेत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर....

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. इन्स्टाग्रामवर अनेकजण रील्स बनवत असतात. मात्र सोशल मीडियावरील रील्सची चर्चा संसदेत झाली. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात राज्यसभेत आज रील्सचा मुद्दा उपस्थित केला गेला. समाजवादी पार्टीचे खासदार प्रोफोसर राम गोपाल यादव यांनी रील्समधील तोकड्या कपड्यांवर भाष्य केलं. राज्यसभेच्या झिओ अवरमध्ये राम गोपाल यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काही लोक असे कपडे घालून रील बनवतात की नजर झुकवावी लागते. याची गंभिरता लक्षात घेता सरकारने यात लक्ष घालावं, असं त्यांनी म्हटलं.
राम गोपाल यादव काय म्हणाले?
कुठल्याही समाजात नग्नता आणि दारूचं सेवन वाढलं तर समाजाची सभ्यता नष्ट होते. हे सगळं रोखणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. जनसंघच्या जमान्यातील भारतीय सभ्यता आणि संस्कृतीच्या सुरक्षेच्या नाऱ्याचीही आठवण राम गोपाल यादव यांनी करून दिली.
आमच्या जमान्यात इंग्रजी भाषा सहावीच्या वर्गापासून पुढे शिकवली जात असे. जेव्हा मूल थोडं- फार शिकत होतं, तेव्हा त्याला शिकवल्या जात की, कॅरेक्टर इज लॉस एव्हरी थिंग इज लॉस…. पण आज परिस्थिती बदलली आहे. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत. यात विशेषकरून मी इन्स्टाग्राम रील्सचं नाव घेऊ इच्छितो. सरासरी पाहिलं तर देशातील युवक तीन तास इन्स्टाग्रामवरचे रील्स पाहात असतात. अश्लील सिरियल्स आणि अश्लील कार्यक्रम पाहण्यात ते बराच वेळ घालवत आहेत, असं राम गोपाल यादव म्हणाले.
सरकारचं लक्ष वेधलं
सोबत बसण्याने, सोबत जेवल्याने कुटुंबात प्रेम वाढतं. पण सध्या तसं होताना दिसत नाही. कुटुंबासोबत असतानाही लोक फोनमध्ये व्यस्त असतात. मागच्या काही काळात तर असं पाहायला मिळालंय की इन्स्टाग्रामवर ओळख होते. मग मैत्री होते पुढे हे लोक प्रेमात पडतात आणि मग लग्न करतात. लग्नानंतर मात्र धक्कादायक वास्तव समोर येतं. मुलगा मुलीची हत्याही झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नग्नता आणि मद्यसेवन या गोष्टी टाळायला हव्यात. याविरोधात सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत, असं राम गोपाल यादव म्हणाले.
