साहिल आंधळा झाला, जोपर्यंत एफआयआर दाखल होणार नाही, तोपर्यंत हटणार नाही; राहुल गांधी आक्रमक
जंतरमंतर आंदोलनात पॅलेट गनने जखमी साहिल लोहबचसाठी राहुल गांधींनी एफआयआरची मागणी करत संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. साहिलच्या शरीरात २०० हून अधिक छर्रे असून डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी "वरिष्ठांचा आदेश" असल्याचे सांगत एफआयआर दाखल करण्यास नकार दिला.

जंतरमंतरवरील आंदोलनात कॅनोट पॅलेस परिसरात साहिल लोहबच याला पॅलेट गनचे छर्रे लागले. त्याच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे आहेत. त्याच्या डोळ्याला तीन छर्रे लागले. तो पाहू शकणार नाही. तो आंधळा झालाय. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला पाहिजे. जोपर्यंत एफआयआर दाखल करून घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या बाहेरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या दीड तासापासून संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाण मांडून बसले आहेत. पॅलेट गन पीडित साहिल लोहबच, त्याचे आईवडीलही ठिय्या आंदोलन करत आहेत. राहुल गांधी यांच्या या आंदोलनात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही सामील झाल्या आहेत. राहुल गांधी आधी साहिलला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांना एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. तब्बल 40 तास पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर राहुल गांधी बाहेर आले आणि त्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर पीडितासोबत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या दीड तासापासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, पोलिसांकडून त्याची काहीच दखल घेतली जात नाहीये.
शरीरात 200 छर्रे
या नंतर राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साहिलला लागलेले छर्रे दाखवले. तसेच साहिलचा मेडिकल रिपोर्टही वाचून दाखवला. 20 जुलै रोजी पॅलेट गनचा वापर झाला. त्याचा पुरावा हा आहे, असं सांगत राहुल गांधी यांनी छर्रे दाखवले. हे सर्व छर्रे या तरुणाच्या शरीरातून आले आहेत. 200 पॅलेट या विद्यार्थ्यांच्या शरीरात आहे. त्याच्या डोळ्यात तीन छर्रे आहेत. त्याचे डोळे कमकुवत झाले आहेत. तो पाहू शकणार नाही, अशी स्थिती आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
एफआयआर दाखल न करण्याचा वरून आदेश
आमचं एवढंच म्हणणं आहे की, एफआयआर दाखल करा. मुलाचे आईवडील आले आहेत. आमचं केवळ एकच म्हणणं आहे कृपया एफआयआर दाखल करा. एफआयआर दाखल करू नका, असा आम्हाला वरून आदेश आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण जोपर्यंत एफआयआर दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन बाहेरून उठणार नाही. देशातील लाखो लोकांबाबत असंच घडतं. ज्या महिलांवर बलात्कार होतो, त्यांच्याबाबतही हेच होतो, असा आरोप राहुल गांधींनी केला.
पोलीस न्याय देत नाही
आमचं म्हणणं आहे एफआयआर दाखल करा. चौकशी अधिकाऱ्याचं नाव सांगा आम्ही निघून जाऊ. आम्ही केवळ या कुटुंबासाठी न्याय मागत आहोत. भारतात तरुणांवर गोळ्या घातल्या जाऊ शकतात. पण या देशात अमित शाह यांची होम मिनिस्ट्री आणि दिल्ली पोलिसांचे लोक न्याय देणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात
यावेळी साहिलच्या वकिलानेही प्रतिक्रिया व्यक्त केली. 13 ऑगस्टपासून एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात या कुटुंबाला पाठवलं जात आहे. आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. त्यांनी कॅनॉट पॅलेसला पाठवलं. दिवसभर बसून ठेवल्यानंतर आम्हाला डीसीपी क्राईम ब्रँचला पाठवलं. त्यानंतर त्यांना सांगितलं वरून ऑर्डर आहे. एफआयआर दाखल करता येणार नाही. त्याची तक्रारही घेतली जात नाही. एफआयआर अजून घेतला नाही, असं साहिलच्या वकिलाने सांगितलं.