आधी कारने चिरडलं, पण हेल्मेटमुळे वाचला, 20 दिवसाने सापच… Snake Murder ने सर्वच हादरलं

मेरठमधील 'स्नेक मर्डर'ने खळबळ उडवली आहे. पत्नी दामिनी आणि प्रियकर तुषारने विम्यासाठी व प्रेमसंबंधातून अतुल पंवारची हत्या केली. आधी कार अपघाताचा प्रयत्न फसल्यावर, त्याला झोपेच्या गोळ्या देऊन त्याच्या चादरीत विषारी साप सोडला. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, हे धक्कादायक षडयंत्र उघड झाले आहे.

आधी कारने चिरडलं, पण हेल्मेटमुळे वाचला, 20 दिवसाने सापच... Snake Murder ने सर्वच हादरलं
Snake Murder
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 4:42 PM

मेरठमधील स्नेक मर्डर सध्या चर्चेत आहे. या मर्डरमध्ये असंख्य खुलासे होत आहेत. हे नुसते खुलासे नाहीत तर धक्कादायक खुलासे आहेत. त्यामुळे अनेकांचे हातपाय लटलट कापत आहेत. अतुल पंवार या व्यक्तीची त्याच्या बायकोने हत्या केली. त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याच्या चादरीत साप सोडून त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी अधिक तपास केला असता यात वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 दिवसापूर्वीही अतुल पंवार याच्या पत्नीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण दैव बलवत्तर म्हणून तो वाचला होता.

उत्तर प्रदेशातील मेरठच्या हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. या प्रकरणी मृतक अतुल पंवार याची बायको दामिनी आणि तिचा कथित प्रियकर तसेच स्कूल ड्रायव्हर तुषार ऊर्फ निक्की याच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येमागे प्रेमसंबंध आणि 20 लाखाची विमा राशी ही दोन मुख्य कारणं असल्याचं समोर आलं आहे. आरोपीने आधी अतुलला रस्ते अपघातात मारण्याचा प्रयत्न केला होता. तुषारने आर्टिगा कारने अतुलला धडक दिली होती. पण अतुलने हेल्मेट घातलेलं असल्याने त्याचा जीव वाचला. त्यानंतर त्याने अतुलचा मृत्यू हा अपघात वाटला पाहिजे, अशा पद्धतीचा उपाय शोधल्याचं पोलीस तपासात आढळून आलं आहे.

20 दिवसापूर्वी काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी अतुल पंवार बाईकने जात होते. त्यावेळी तुषारने आर्टिगा कारने त्यांना धडक दिली. हा काही सामान्य अपघात नव्हता. तर आरोपींच्या योजनेचा एक भाग होता. ही धडक खूप जोरदार होती. पण केवळ अतुलने हेल्मेट घातलेलं होतं म्हणून त्याचा जीव वाचला. गंभीर अपघातातही तो वाचला. त्यामुळे आरोपींच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.

पत्नी म्हणाली, गाडी नंबर नाही

हा अपघात झाल्यानंतर अतुलने या प्रकरणाची पोलीस तक्रार केली पाहिजे, असं पत्नी दामिनीला सांगितलं होतं. पण गाडी नंबर माहीत नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करून काय फायदा? त्याने काहीच होणार नाही, असं सांगून दामिनीने अतुलला गुन्हा दाखल करण्यास मनाई केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तेव्हाच हा गुन्हा दाखल झाला असता तर आज चौकशी वेगळ्या पद्धतीवर गेली असती. प्रकरण तिथेच दाबलं गेलं. त्यामुळे आरोपीला दुसरं षडयंत्र तयार करण्यासाठी वेळ मिळाला, असं पोलीस म्हणाले.

नंतर दुसरा डाव

पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आरोपीने दुसरं षडयंत्र रचलं. हत्या वाटणार नाही, असं षडयंत्र त्यांनी रचलं. गुरुवारी रात्री अतुलच्या दुधात झोपेच्या गोळ्या प्रमाणाबाहेर टाकण्यात आल्या. जेव्हा तो झोपी गेला, तेव्हा त्याच्या चादरीत विषारी साप सोडला गेला. गाढ झोपेत असल्याने तो स्वत:ला वाचवू शकला नाही. त्याला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला.

सकाळी दामिनी अतुलला रुग्णालयात घेऊन गेली आणि त्याला साप चावल्याचं सांगितलं. डॉक्टरांनीही अतुलला मृत घोषित केलं. पोलीस जेव्हा घटनास्थळी आली तेव्हा त्यांना बेडवर साप सापडला. पाहताच क्षणी साप चावल्याने मृत्यू झाला असावा असं दिसत होतं. पण घटनास्थळातील परिस्थिती काही वेगळीच होती. पोलिसांना सापाची ही कहाणी वेगळेच संकेत देत होते. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

Follow Us