Indian Railway: अवघ्या 9 मिनिटात प्रवास संपणार, देशातील सर्वात छोटा रेल्वे रूट
Shortest Railway Route: भारतीय रेल्वेचे विशाल नेटवर्क आहे. देशात रेल्वेचे मोठे जाळे आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास अनेक जण करतात. अवघ्या तीन किलोमीटरचा एक टप्पा गाठून रेल्वे पुढे जाते. हा देशातील सर्वात छोटा रेल्वे रूट आहे.

Indian Railway facts: देशात रेल्वेचे मोठे विस्तीर्ण जाळे आहे. हे जगातील चौथ्या क्रमांकाचं मोठं रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेचा प्रवास सोपा, स्वस्त आणि आरामदायी असल्याने प्रवासी या पर्यायाला प्राधान्य देतात. खासकरून लांब प्रवासासाठी रेल्वेला अधिका प्राधान्य दिल्या जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेमुळे पोहचता येते. भारतीय रेल्वे कात टाकत आहे. वेगवान रेल्वेचे युग आले आहे. वंदे भारत रेल्वे ही सर्वात जलद ट्रेन आहे. नवनवीन रेल्वे मार्गिका तयार होत आहे. तर काल हायड्रोजन रेल्वेही हरियाणात धावली. पण अवघ्या तीन किलोमीटरचा टप्पा गाठणारा रेल्वेचा सर्वात छोटा रेल्वे रूट तुम्हाला माहिती आहे का?
देशातील सर्वात छोटा रेल्वे मार्ग
देशात लांबच्या प्रवासासाठी दोन दोन दिवस लागतात. काही अंतरासाठी तर हा कालावधी चार दिवसांचा आहे. मुंबई ते ईशान्येतील राज्य गाठण्यासाठी खूप कालावधी लागतो. पण देशातील सर्वात कमी कालावधीचा रेल्वे रूट हा महाराष्ट्रात आहे. म्हणजे दोन रेल्वे स्टेशनमधील अंतर अवघे तीन किलोमीटर आहे. साधारणपणे या प्रवासासाठी 9 मिनिटांचा कालावधी लागतो. देशातील हा सर्वात छोटा रेल्वे रूट नागपूर ते अजनी या दोन स्टेशनदरम्यान आहे.
विशेष म्हणजे या छोट्या प्रवासासाठी हजारो लोक रेल्वेचाच प्रवास करतात. अनेक मोठ्या रेल्वे गाड्याही इथं थांबत असल्याने उपराजधानीत जाणे येथील लोकांसाठी एकदम सोपं आहे. या रेल्वे प्रवासासाठी साधारणपणे 60 ते 70 रुपये भाडे आकारले जाते. तर स्लीपर क्लासचे भाडे 175 रुपये इतके आहे. पॅसेंजर ट्रेनचे भाडे तर सर्वात कमी आहे.
या रेल्वे रूटवर चार ते पाच रेल्वे धावतात. त्यात विदर्भ एक्सप्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ आणि नागपूर-पुणे एक्सप्रेसचा समावेश आहे. या रेल्वे रुटवर चाकरमानी, आजुबाजूचे गावकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्ग नियमित प्रवास करतात. या छोट्या प्रवासासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते. रेल्वेत जागा मिळणेही कठीण होते. नागपूरहून अजनी रेल्वे स्टेशनवर आल्यावर, रेल्वे इथं दोन मिनिटं थांबते. सर्वात छोटे अंतर असलेल्या रेल्वे रूटचा विक्रम या स्टेशनच्या नावावर आहे. नागपूरहून माणूस चढत नाही तोच अजनी स्टेशन येते. त्यामुळे प्रवासाचा क्षीण, ताण, थकवा येथील प्रवाशांना काही जाणवत नाही, हे या मार्गाचे वैशिष्ट्ये आहे.
