IND vs ENG : इंग्लंडमध्ये मालिका जिंकणं सोपं नाही, लॉर्ड्सवर गेल्या 22 वर्षात वनडेत भारताची नकोशी कामगिरी
IND vs ENG 3rd ODI Lords: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक असणार आहे. हा सामना लॉर्ड्सवर होणार असून क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण या मैदानावर भारताचा रेकॉर्ड काही खास नाही.

इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान शुबमन गिल आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी असून लॉर्ड्सवर होणारा तिसरा सामना निर्णायक असणार आहे. भारतासमोर हा सामना जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण मागच्या काही वर्षांचा इतिहास भारतीय संघाच्या अगदी विरुद्ध आहे. भारताला वनडे मालिका जिंकायची असेल तर 22 वर्षे जुना विक्रम मोडीत काढावा लागणार आहे. कारण गेल्या 22 वर्षात भारताने एकही वनडे सामना या मैदानात जिंकलेला नाही. त्यामुळे भारताला 22 वर्षांपासून सुरू असलेला पराभवाचा कलंक पुसण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
भारताने 2004 मध्ये मिळवला होता शेवटचा विजय
भारतीय संघाची लॉर्ड्सवरील कामगिरी निराशाजनक आहे. भारताने 1983 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवला होता. त्याने 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला होता. या विजयात सौरव गांगुलीने टीशर्ट काढून सेलीब्रेशन केलं होतं. पण 2004 नंतर भारताला या मैदानात एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने लॉर्ड्सवर 5 सप्टेंबर 2004 मध्ये शेवटचा विजय मिळवला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडला 23 धावांनी पराभूत केलं होतं. त्या विजयानंतर आतापर्यंत 22 वर्षांचा कालावधी लोटला आहे. पण विजय काही मिळालेला नाही.
मागच्या 4 सामन्यात भारतीय संघाची वाईट स्थिती
लॉर्ड्स मैदानात मागच्या चार वनडे सामन्यात भारताची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. इंग्लंडने भारतला 2007 मध्ये 7 गडी राखून पराभूत केलं होतं. 2011 मध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर 2018 मध्ये इंग्लंडने भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवून दिली होती. हा सामना इंग्लंडने 86 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. तर 2022 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा वनडे सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडने भारताला 100 धावांनी पराभूत केलं होतं.
गिलच्या नेतृत्वात इतिहास बदलणार
लॉर्ड्सचं मैदान इंग्लंडसाठी खूपच लकी आहे. त्यामुळे या मैदानात विजयासाठी भारताला खूपच संघर्ष करावा लागणार आहे. आता कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ 22 वर्षे जुना नकोसा विक्रम पुसणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. या सामन्यात सर्वच खेळाडूंना अष्टपैलू कामगिरी करावी लागणार आहे.
