Soanm Wangchuk : मोठी बातमी ! सोनम वांगचुक यांच्याकडून चक्क मोदी सरकारचं कौतुक; प्रधान यांच्या राजीनाम्याचं नव्हे या निर्णयाचं केलं कौतुक

परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या सुधारणा विधेयकाबाबत सोनम वांगचुक यांनी समाधान व्यक्त केलं. परीक्षांशी संबंधित समस्यांवर उपाययोजना करण्यासोबतच सरकारने शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याच्या दिशेनेही काम केले पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.

Soanm Wangchuk : मोठी बातमी ! सोनम वांगचुक यांच्याकडून चक्क मोदी सरकारचं कौतुक; प्रधान यांच्या राजीनाम्याचं नव्हे या निर्णयाचं केलं कौतुक
सोनम वांगचुक यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक
| Updated on: Jul 30, 2026 | 11:38 AM

नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत 26 दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते, सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारने परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचं स्वागत केलं आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर काश्मीरमध्ये एक दिवस विश्रांती घेत ते लडाखकडे रवाना झाले. यावेळी वांगचुक यांनी संसदेत पेपर लीकविरोधात विधेयक मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केलं . तसेच परीक्षा व्यवस्थेबरोबरच संपूर्ण शिक्षण प्रणालीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. वांगचुक यांनी सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या चर्चेनुसार आणि दिलेल्या आश्वासनांप्रमाणे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारने देशातील विशेषतः तरुणांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन वांगचुक यांनी केलं.

जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनात उपोषण करणारे सोनम वांगचुक हे आंदोलनाचे प्रमुख चेहरा ठरले होते. 18 जुलै रोजी त्यांना जंतर-मंतरवरून जबरदस्तीने हटवन रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर, लोकांचा  मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि आंदोलनाला पुन्हा वेग आला. या घडामोडींनंतर केंद्र सरकारवर दबाव वाढला. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वीच वांगचुक यांनी सरकारकडून काही आश्वासनं मिळाल्यानंतर आपले उपोषण संपवलं होतं.

महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

अखेर ,  गुरुग्राम येथील रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर वांगचुक यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आपल्या घरी परतले. नवी दिल्ली ते श्रीनगर सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनमधून त्यांनी प्रथमच प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी चिनाब ब्रिज पाहण्याची इच्छाही पूर्ण झाली, असं त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. भारतीय रेल्वेच्या या प्रगतीबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

विधेयकाबद्दल काय म्हणाले वांगचुक ?

लोकसभेत परीक्षा लीकविरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आनंद व्यक्त केला. वांगचुक यांनी सरकारसमोर ठेवलेल्या मागण्यांमध्ये संसदेत या विषयावर चर्चा करण्याची मागणीही समाविष्ट होती. ” परीक्षांमधील सुधारणांबाबत संसदेत विधेयक आणण्यात आलं याचा मला आनंद आहे.  ही सुधारणा केवळ परीक्षांपुरती मर्यादित राहणार नाही, तर शिक्षण व्यवस्थेतही होतील आणि हे प्रयत्न पुढेही सुरू राहतील ” अशी आशा वांगचुक यांनी केली. ” मी सरकारला आवाहन करू इच्छितो की, माझ्यासोबत लेखी स्वरूपात आणि त्यानंतर सीजेपीसोबत झालेले करार कायम ठेवावेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, या आश्वासनाचे पालन करावे. देशात, विशेषतः युवा पिढीमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि आपण सर्वांनी मिळून राष्ट्रनिर्माण व महान भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावे” असंही ते म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us