तमिळनाडूच्या बहुमत चाचणीत विजय यांच्या सरकारला मोठं यश; पहिली प्रतिक्रिया समोर
Tamil Nadu Assembly Floor Test : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडू विधानसभेच्या बहुमत चाचणीत यश मिळवलं आहे. या बहुमत चाचणीत त्यांच्या सरकारला मोठा पाठिंबा मिळाला आहे. विजय यांच्या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सहज पार करून सभागृहात आपली ताकद सिद्ध केली आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आज (बुधवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. एकूण 144 आमदारांनी टीव्हीकेच्या बाजूने मतदान केलं, तर 22 जणांनी विरोधात मतदान केलं आहे आणि पाच जण तटस्थ राहिले. विजय यांनी स्थापन केलेल्या नव्या सरकारची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हा विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. 171 सदस्यीय विधानसभेत विजय यांनी सहजपणे स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस, सीपीआय (एम), व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययुएमएल) यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला. काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला, तर सीबीआय (एम), व्हीसीके आणि आययूएमएलने प्रत्येकी दोन आमदारांसह बहुमत चाचणीत योगदान दिलं. अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगमचे (एएमएमके) आमदार एस. कामराज यांनीही सरकारच्या बाजूने मतदान केलं.
बहुमत चाचणीतील या यशानंतर मुख्यमंत्री विजय यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘हे अल्पसंख्याकांचं सरकार आहे. अल्पसंख्याकांसाठी काम करणारं हे सरकार आहे’, अशी प्रतिक्रिया विजय यांनी दिली. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू असलेल्या तीव्र राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठं बळ देणारा ठरला आहे.
तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी सभागृहाला संबोधित केलं. विश्वासदर्शक ठरावादरम्यान टीव्हीके सरकारला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे आणि आमदारांचे त्यांनी आभार मानले. या आघाडीला ‘मक्कल आघाडी’ (जनतेची आघाडी) असं संबोधून विजय यांनी ठामपणे सांगितलं की, त्यांचं सरकार जातीय राजकारणाने अजिबात प्रेरित नाही. तसंच समाजातील प्रत्येक घटकासाठी हे सरकार काम करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी विजय असंही म्हणाले की, हे सरकार फक्त त्यांना मतदान करणाऱ्यांचंच नाही, तर निवडणुकीत त्यांना विरोध करणाऱ्यांचही आहे. “टीव्हीके सरकार सुशासनावर लक्ष केंद्रीत करेल आणि तमिळनाडूच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करेल”, असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन हे विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारवर जोरदार हल्ला चढवत म्हणाले की, “तमिळनाडू विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान आमचा पक्ष मतदानापासून दूर राहील. टीव्हीकेला निवडणुकीत जनतेचा स्पष्ट कौल मिळवण्यात अपयश आलं आहे आणि आता सत्तेत राहण्यासाठी ते निवडणुकीनंतरच्या आघाड्यांवर अवलंबून आहेत.”
जवळपास 65 टक्के मतदारांनी विजय यांना मुख्यमंत्रीपदासाठी नाकारलं असल्याचा आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी केला. विजय यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले, “त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा नाही. विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी घोडेबाजार केला. भाजपचा मित्रपक्ष अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगमने (एएमएमके) आता टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत विजय यांना मतदान केल्याचा अनेक लोकांना आता पश्चात्ताप होत आहे.”
