Tomato Price hike | मुंबईत पावकिलो टोमॅटो 40 रुपये, पण एका भागात 63 रुपयात मिळतायत 5 किलो टोमॅटो

Tomato Price hike | देशाच्या या भागात टोमॅटोची जोरदार स्मगलिंग सुरु आहे. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचा परिणाम आता ढाबे, हॉटेल्सवर दिसू लागलाय. अनेक हॉटेल्सनी आपल्या मेन्यू लिस्टमधून टोमॅटो हटवला आहे.

Tomato Price hike | मुंबईत पावकिलो टोमॅटो 40 रुपये, पण एका भागात 63 रुपयात मिळतायत 5 किलो टोमॅटो
Tomato Price
| Updated on: Jul 16, 2023 | 8:56 AM

मुंबई : कांद्यामुळे डोळ्यात पाणी येतं. पण सध्या देशात टोमॅटोमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. टॉमेटोच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे. एका महिन्याच्या आत टोमॅटोच्या किंमती 10 पटीने वाढल्या आहेत. सामान्य जनतेसाठी टोमॅटो जणू स्वप्न बनलाय. फक्त श्रीमंतांना टोमॅटो परवडू शकतो, अशी स्थिती आहे. काही भागात टोमॅटो 250 रुपये किलोने विकला जात आहे.

याचा परिणाम आता ढाबे, हॉटेल्सवर दिसू लागलाय. अनेक हॉटेल्सनी आपल्या मेन्यू लिस्टमधून टोमॅटो हटवला आहे. टोमॅटोच्या किंमती जास्त असल्याने स्मगलिंग सुरु आहे.

कुठल्या देशातून सुरु आहे टोमॅटोची स्मगलिंग?

देशातील मेट्रो शहरात म्हणजे मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटो परवडेनासा झालाय. टोमॅटोच्या वाढत्या दरांनी सगळेच हैराण आहेत. दरम्यान भारत-नेपाळ बॉर्डरवरील गाव आणि शहरात सध्या लोक चायनीज टोमॅटोचा स्वाद घेतायत. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमांचल भागात चिनी टोमॅटोची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यासाठी नेपाळमार्गे चिनी टोमॅटोची तस्करी सुरु आहे.

कुठे स्वस्तात विकले जातायत टोमॅटो?

बॉर्डरवर तैनात असलेले जवान आणि पोलीस टोमॅटोची तस्करी करणाऱ्या पकडत आहेत. मात्र, तरीही टोमॅटोची तस्करी थांबलेली नाही. नेपाळमध्ये चिनी टोमॅटो खूप स्वस्तात विकले जातायत. नेपाळमध्ये 100 रुपयात 5 किलो टोमॅटो मिळतायत. त्यामुळे तस्कर नेपाळहून स्वस्तात चायनीज टोमॅटो विकत घेऊन भारतात आणतायत. भारतात हेच टोमॅटो जास्त दर लावून विकले जातायत.

जप्त केलेल्या 3 टन टोमॅटोची किंमत किती?

नेपाळला लागून असलेल्या पूर्णिया जिल्ह्यात चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो 100 ते 150 रुपये किलोने विकला जात आहे. भारताचा एक रुपया म्हणजे नेपाळचे 63 पैसे. याचाच अर्थ नेपाळच्या 100 रुपयाच भारतीय मुद्रेत 63 रुपये मूल्य आहे. भारत-नेपाळ सीमेवर पोलीस आणि सशस्त्र सीमा बलचे जवान तैनात आहेत. त्यांनी 3 टन टोमॅटो जप्त केला. त्याची किंमती 4.8 लाख रुपये आहे.