उत्तरांखडच्या उत्तरकाशीत विध्वसंक ढगफुटी, जवानांसह 50 पेक्षा जास्त लोक गायब!
उत्तरांखड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथे भारतीय लष्कराच्या तळापासून साधारण 4 किमी दूर असणाऱ्या धराली गावात ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धराली गावात मोठा विध्वंस झाला आहे. घडफुटी झाल्यानंतर त्या भागात मोठा पूर आला असून तब्बल 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Uttarkashi Dharali Cloudburst: उत्तरांखड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथे भारतीय लष्कराच्या तळापासून साधारण 4 किमी दूर असणाऱ्या धराली गावात ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धराली गावात मोठा विध्वंस झाला आहे. घडफुटी झाल्यानंतर त्या भागात मोठा पूर आला असून तब्बल 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त लोक गायब झाले आहेत. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. दुर्घटनेची माहिती होताच या भागात युद्धपातळीवर बचावकार्य चालू आहे
ढगफुटीमुळे चिखल आणि पाण्याचा फार मोठा पूर
या ढगफुटीमुळे पवित्र गंगोत्री धामचा रस्तादेखील वाहून गेला आहे. अचानक आलेल्या ढगफुटीमुळे चिखल आणि पाण्याचा फार मोठा पूर आला आहे. या पुरात धराली परिसर जलमग्न झाला आहे. ही दुर्घटना घडताच आपत्कालीन मदत पाठवण्यात आली असून तिथे युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे.
उत्तरकाशीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत आणखी किती लोकांचा मृत्यू झाला तसेच वित्तहानी किती झाली? हे आगामी काळात समजेल, असे प्रशांत आर्य यांनी सांगितले. दुसरीकडे ही दुर्घटना होताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी धरालीतील दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं. एसडीआरएफ, एनडीआरएफ तसेच जिल्हा प्रशासन बचावकार्य करत आहेत. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असं पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं.
एका क्षणात घर, हॉटेल गेले वाहून
धाराली गाव गंगोत्र धामच्या साधारण 20 किमी अलिकडे आहे. भाविकांना थांबण्यासाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ही घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शी राजेश पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. खीर गंगाच्या परिसरात ढगफुटी झाली आहे. त्यामुळे नदीत विध्वसंक पूर आला. या पुरात पाणी आणि चिखल मोठ्या प्रमाणात होता. यात अनेक घरं, हॉटेल वाहून गेले. विशेष म्हणजे हा पूर आल्याचे पाहून लोक सैरावेरा पळत सुटले होते. यात काही लोक वाहून गेले.
