वरुण गांधी भाजपशी काडीमोड घेणार?, ट्विटर अकाउंटवरून ‘भाजप’ शब्द हटवला; नेमके संकेत काय?

| Updated on: Oct 04, 2021 | 4:47 PM

उत्तर प्रदेशातील पीलीभीत येएथील भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नाव काढून टाकलं आहे. वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर थेट हल्ला करत आहेत. (Varun Gandhi removed word BJP from bio of his Twitter account In morning itself)

वरुण गांधी भाजपशी काडीमोड घेणार?, ट्विटर अकाउंटवरून भाजप शब्द हटवला; नेमके संकेत काय?
Varun Gandhi
Follow us on

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पीलीभीत येएथील भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नाव काढून टाकलं आहे. वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर थेट हल्ला करत आहेत. त्यानंत त्यांनी आता थेट ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नाव हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून वरुण गांधी भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वरुण गांधी यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रंही लिहिलं आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. लखीमपुरा हिंसेबाबत वरुण गांधी यांनी योगी सरकारला पत्रं पाठवलं होतं. आंदोलक शेतकऱ्यांवर निर्दयपणे हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. गांधी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. अन्नदात्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली ती एखाद्या सभ्य समाजासाठी अक्षम्य आहे. आंदोलक शेतकरी आपले बांधव आहेत. काही मुद्द्यांवर आंदोलकांमध्ये रोष असेल आणि ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतील तर त्यांच्याशी संयम आणि धैर्याने वागलं पाहिजे, अशा शब्दात वरुण यांनी योगी सरकारला सुनावले आहे.

पत्रात काय?

कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शेतकऱ्यासोबत चांगलं वागलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून संवेदनशीलतेने सर्व मुद्दे हाताळले पाहिजे. या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

भाजप सोडणार?

योगी सरकारला खरमरीत पत्रं लिहिल्यानंतर वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला आहे. त्यामुळे वेगवेगळे कयास वर्तवले जात आहेत. वरुण गांधी भाजप सोडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये वरुण यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवाय भाजप पक्षातही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते अडगळीत पडल्याची भावना त्यांना सतावत असावी. म्हणूनच ते भाजपवर नाराज असल्यानेच त्यांनी अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला असावा, असं राजकीय जाणकार सांगतात.

 

अभिनंदन आणि मागणी

योगी सरकारने ऊसाला प्रति क्विंटलमागे 350 रुपये हमी भाव जाहीर केला होता. त्याबद्दल वरुण यांनी योगी सरकारचं अभिनंदन केलं होतं. मात्र, ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना खूप खर्च येतो. शिवाय महागाई वाढलेली आहे. त्यामुळे हा भाव 400 रुपये करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

 

संबंधित बातम्या:

Lakhimpur Kheri Violence : कुणाचा जीव जात असेल तर जबाबदारी कुणाची? सुप्रीम कोर्टाचा सवाल