कालपर्यंत धुंडीभांडी करायची, महिन्याला 2500 रुपयांची मिळकत, आज थेट कॅबिनेट मंत्री, IAS अधिकाऱ्यांना देणार आदेश
पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात विस्तारानंतर, धुणीभांडी करून महिन्याला 2500 रुपये मिळवणाऱ्या कलिता माझी यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली आहे. शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने त्यांना ही संधी दिली आहे. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असून, आता त्या थेट आयएएस अधिकाऱ्यांना आदेश देतील.

पश्चिम बंगालमधील शुभेंदु अधिकारी यांच्या सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजप सत्तेत आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान देताना अधिक काटेकोरपणा पाळण्यात आला आहे. 24 दिवसांपूर्वी शुभेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत निसिथ प्रमाणिक यांनीही राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली होती. आज शुभेंदु अधिकारी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळात अनेक नवीन आणि अनोख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे भांडीधुणी करणाऱ्या एका महिलेला शुभेंदु अधिकारी यांनी थेट कॅबिनेट मंत्री केलं आहे.
राज्यात पहिल्यांदाच सरकार स्थापन केल्यानंतर तीन आठवड्यानंतर शुभेंदु अधिकारी यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. नबन्ना येथे शपथविधी समारंभ पार पडला. यावेळी भाजपच्या 35 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांची संख्या आता 6 वरून थेट 41 वर गेली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत 294 सदस्य असून मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 44 मंत्री ठेवता येतात. पण भाजपने अजून तीन मंत्रिपदे रिक्त ठेवली आहेत. यथावकाश ही मंत्रिपदे भरली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
13 जणांना कॅबिनेटची लॉटरी
शुभेंदु सरकारमध्ये 13 जणांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्याशिवाय तीन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) असणार आहेत. तर 19 जणांना राज्यमंत्री करण्यात आलं आहे. कॅबिनेटमधील 13 मंत्र्यांमध्ये तपस रॉय, दीपक बर्मन, शंकर घोष, अर्जुन सिंह, मनोज उरांव, गौरी शंकर घोओष, जगन्नाथ चट्टोपाध्याय, स्वपन दासगुप्ता, कल्याण चक्रवर्ती, अनूप कुमार दास, अजय कुमार पोद्दार, शरदवत मुखोपाध्याय आणि दूध कुमार मंडल यांचा समावेश आहे. तर राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असलेल्यांमध्ये मालती राभा रॉय, इंद्रनील खान आणि राजेश मेहता यांचा समावेश आहे.
तर,अशोक डिंडा, जोएल मुर्मू, आनंदमय बर्मन, कौशिक चौधरी, गार्गी दास घोष, भास्कर भट्टाचार्य, दिवाकर घरामी आणि सुमना सरकार यांना राज्यमंत्री करण्यात आलं आहे. त्याशिवाय शांतनु प्रमाणिक, पूर्णिमा चक्रवर्ती आणि उमेश राय यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.
घरकामवाली बनली मंत्री
कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीतील एक नाव आश्चर्यकारक आहे. कलीता माझी हे ते नाव. पूर्व बर्दवानच्या औशग्राम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर कलिता मंत्री बनल्या आहेत. त्यांचं आयुष्य अधिक संघर्षमय राहिलं आहे. कलीता या राजकारणात येण्यापूर्वी धुणीभांडी करायच्या. महिन्याला त्या जेमतेम 2500 रुपये कमवायच्या. कुटुंब चालवताना त्या मोलकरीण म्हणून तर नवरा प्लंबरचं काम करतो. त्यांना थेट कॅबिनेट मंत्री बनवलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कलीता या आता आयएएस अधिकाऱ्यांना आदेश सोडणार आहेत.
