Who is Nandan Nilekani : कोण आहेत नंदन नीलेकणी? ज्यांच्यावर मोदींनी ठेवला विश्वास, परीक्षा पद्धतीत करणार मोठे बदल!
2014 सालच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहून तंत्रज्ञान, सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले.

Who is Nandan Nilekani : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील परीक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेचे आयोजन तसेच एकूण परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट करून या निर्णयाबाबत घोषणा केली आहे. त्यांनी परीक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी एक उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी नंदन नीलेकणी यांच्यावर सोपली आहे. दरम्यान, आता हे नंदन नीलेकणी नेमके कोण आहेत? त्यांनी याआधी नेमकं काय काय केललं आहे? असं विचारलं जात आहे.
नंदन नीलेकणी कोण आहेत?
नंदन नीलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. त्यांना ‘आधार’ प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार म्हटले जाते. 2 जून 1955 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी पटनी कॉम्प्युटर सिस्टिम्समध्ये नोकरी सुरू केली. याच काळात त्यांची एन. आर. नारायण मूर्ती यांच्याशी ओळख झाली. पुढे 1981 मध्ये दोघांसह सात जणांनी मिळून इन्फोसिसची स्थापना केली. कंपनीला जागतिक स्तरावर नेण्यात नीलेकणी यांचा मोठा वाटा होता. 2002 ते 2007 या काळात त्यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणूनही काम पाहिले.
UIDAI चे पहिले अध्यक्ष
2009 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने त्यांच्याकडे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे पहिले अध्यक्षपद सोपवले. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘आधार’ ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली उभी राहिली. आज सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे, ओळख पडताळणी आणि डिजिटल सेवा अधिक सक्षम करण्यामध्ये आधारची महत्त्वाची भूमिका आहे.
काँग्रेसच्या तिकिटावर लढवली निवडणूक
2014 सालच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहून तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरण आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले. समाजकार्यातही त्यांचे मोठे योगदान असून 2023 साली त्यांनी आयआयटी मुंबईला तब्बल 315 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याआधीही त्यांनी 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
जबाबदारी कशी पार पाडणार?
त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील मोठे डिजिटल प्रकल्प यशस्वीपणे राबवण्याचा अनुभव आहे. तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळेच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी सरकारने नंदन नीलेकणी यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता ते ही जबाबदारी कशी पार पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
