Bihar Election Result: काँग्रेसची खराब कामगिरी, पराभवाचं कारण काय? अनेक नेते पक्षावर नाराज

Why Congress Loss in Bihar: काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. महाआघाडीतील इतर पक्षही अपयशी ठरले आहेत. काही नेत्यांनी या पराभावाची काही कारणेही सांगितली आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Bihar Election Result: काँग्रेसची खराब कामगिरी, पराभवाचं कारण काय? अनेक नेते पक्षावर नाराज
Congres Leader on Bihar Election Loss
| Updated on: Nov 14, 2025 | 9:43 PM

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाआघाडीचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसला 10 पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. महाआघाडीतील आरजेडी आणि इतर पक्षांनाही अपेक्षित यश मिळालेले नाही. अशातच आता कांग्रेसच्या अनेक नेत्यांनी या पराभवावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही नेत्यांनी या पराभावाची काही कारणेही सांगितली आहेत. मणिशंकर अय्यर सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तर असेही म्हटले की, ‘काँग्रेसने मला बाजूला केले आहे. पक्ष मला पात्र मानत नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारा.’ प्रमुख नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

आमचे जबाबदार नेते लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यात कमी पडले – कृपानाथ पाठक

बिहारमधील पराभवावर बोलताना काँग्रेस नेते कृपानाथ पाठक म्हणाले की, ‘आमचे जबाबदार नेते लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यात कमी पडले. त्यांना योग्य लोकांबद्दल माहिती मिळवता आली नाही. एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? लोक आमच्याकडे तक्रार करत राहतात, मात्र त्या तक्रारी उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात नेते कमी पडले आहेत. यावर काम करावे लागेल, अन्यथा, यामुळे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. पराभव होत असतो मात्र इतक्या कमी जागा मिळतील हे वाटलं नव्हतं.’

आत्मपरीक्षण करावे लागेल – शशी थरूर

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ‘सध्या एनडीएकडे प्रचंड आघाडी आहे. हे खूप निराशाजनक आहे आणि जर ते अंतिम निकाल ठरले तर मला वाटते की गंभीर आत्मपरीक्षण करावे लागेल. आत्मपरीक्षण करणे म्हणजे बसून विचार करणे असा नाही तर काय चूक झाली, काय रणनीतिक, मेसेजिंक किंवा संघटनात्मक चुका होत्या याचा अभ्यास करणे असा आहे. मी बिहारमध्ये प्रचार केलेला नाही. मला बिहारमध्ये प्रचार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्यक्ष माहिती देऊ शकत नाही. पण मी लोकांशी बोलत आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी कुठे चूक झाली याचे काही गंभीर विश्लेषण केले पाहिजे.’

पक्षातील कमकुवत बाजू समोर आणणारा निकाल – निखिल कुमार

काँग्रेस नेते आणि माजी राज्यपाल निखिल कुमार म्हणाले, ‘बिहारचे हे निकाल आमच्या संघटनेतील कमकुवत बाजू समोर आणाणारे आहेत. कोणत्याही निवडणुकीत राजकीय पक्ष त्यांच्या संघटनात्मक ताकदीवर अवलंबून असतो. जर संघटना कमकुवत असेल आणि प्रभावीपणे काम करू शकत नसेल, तर निकालांवर परिणाम होतो. आमचे सर्व उमेदवार खूप सक्षम आहेत, परंतु ते आणखी चांगले असू शकले असते. त्यांनी हुशारीने काम करायला हवे होते.’

आम्ही आत्मपरीक्षण करू – अखिलेश प्रसाद सिंह

काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, ‘काँग्रेस कुठे कमी पडली याचे आम्ही आत्मपरीक्षण करू. मी नितीश कुमार आणि एनडीएचे अभिनंदन करतो. निवडणुकीत आमची कामगिरी का खराब झाली हे राजदचे संजय यादव आणि आमच्या पक्षाचे कृष्णा अल्लावरू अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करू शकतील.’

वास्तव स्वीकारण्याची वेळ आली आहे – मुमताज पटेल

मुमताज पटेल म्हणाल्या की, ‘पराभवासाठी कोणतेही कारण नाही, कुणालाही दोष नाही, आता आत डोकावून पाहण्याची आणि वास्तव स्वीकारण्याची वेळ आली आहे. असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते यशाची वाट पाहत किती काळ पक्षासोबत राहतील? त्याऐवजी, काही व्यक्तींच्या हातात सत्ता केंद्रित झाल्यामुळे, वास्तवापासून पूर्णपणे दूर राहिल्यामुळे आपल्याला सतत अपयशाला सामोरे जावे लागत आहे.’

शकील अहमद काय म्हणाले?

बिहारमधील माजी मंत्री शकील अहमद म्हणाले की, ‘मी काँग्रेस पक्षात नाही. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु तिकीट वाटपानंतर लगेचच अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की एका विशिष्ट व्यक्तीने चुकीच्या कारणांसाठी तिकिटे वाटली आहेत, ज्यामध्ये आर्थिक अनियमितता आणि इतर बाबींचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला आशा आहे की याची चौकशी केली जाईल. जर आरोप खरे असतील आणि तिकिटे इतर कोणत्याही कारणासाठी देण्यात आली असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.’