BLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही?

जगभरातील गरीब लोकांचे आयुष्यमान वाढवायला मदत करणाऱ्या बिल आणि मेलिंडा गेट्स यांना एका व्यक्तीने पत्र लिहिले की, “गरीब मुलांना आरोग्य सुविधा देऊन वाचवू नका, ते जगत राहिले तर आपल्या ग्रहावर लोकसंख्येचा भार उगीच वाढेल आणि याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागेल.” त्या व्यक्तीने गेट्स दाम्पत्याला योग्य सल्ला दिला का?

BLOG: तथ्यप्रियता - भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही?
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 9:41 AM

2014 च्या सुमारास आफ्रिकेत एबोला विषाणूचा उद्रेक झाल्याचं आपल्या सगळ्यांना आठवत असावं. जगभरात दहशत निर्माण झाली होती कारण याची लागण वेगाने पसरत होती. प्रसार माध्यमातून मन्रोविया शहराच्या रस्त्या–रस्त्यावर चाललेलं मृत्यू-तांडव देशोदेशी पोहचत होतं. लायबेरिया या आफ्रिकन देशाची राजधानी असलेलं हे शहर! तेथे पुरेशा आरोग्य सुविधांचा अभाव आणि अक्षम सर्वेक्षण प्रणाली याचा सर्वात जास्त फटका जनसामान्यांना बसला (Factfulness and art of thinking clearly). 

संसर्गजन्य असल्यामुळे खुपच कमी वेळात आंतरराष्ट्रीय सीमारेषा पार करुन वेगवेगळ्या देशांमध्ये या विषाणूचा प्रवास सुरु झाला होता. पाण्यातून, हवेतून, अन्नातून हा विषाणू जगभर थैमान घालत असताना जागतिक आरोग्य संघटनेची (World Health Organisation) टीम कटाक्षाने यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. WHO च्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, या रोगाची लागण दिवसागणिक 1,2,3,4,5  या क्रमात न होता 1,2,4,8,16 अशी दुपटीने वाढत होती. हे चित्र भयावह होतं! नेहमीप्रमाणे सरळ रेषेत वाढणाऱ्या आलेखापेक्षा हा आलेख भीतीदायक होता आणि याचा अंदाज यायला बराच वेळ गेला होता. या वेगाने येत्या 9 आठवड्यात आफ्रिकेतील 50% लोक रोगग्रस्त होणार होते.

जगभरात सगळ्याच तज्ज्ञांनी येथे एक चूक केली होती. एबोलाच्या केसेसची संख्या दिवसागणिक सम प्रमाणात वाढतेय हे गृहीत धरलं असल्यानं संकटाचं योग्य मापन आणि कृती करायची निकड यात उशीर झाला होता. आपल्या बाबतीत ही सामान्यतः असंच काहीसं घडत असतं. कुठलाही आलेख आपण सर्वप्रथम चढत जाणाऱ्या सरळ रेषेसारखाच गृहीत धरतो. याला “Straight Line Instinct” म्हणतात.

प्रा. हांस रोस्लिंग यांच्या ‘Factfulness’ या पुस्तकावर आधारित लेखमालेतील हा तिसरा लेख. या आधीच्या दोन लेखांमध्ये आपण जगातल्या दोन मोठ्या गैरसमजांबद्दल (Mega Misconceptions observed in the world) वाचलं आहे.

1. जगाचे दोन’चं’ भाग पडतात आणि या दोहोंमध्ये जी तफावत आहे, ती वाढतेच आहे (येथे वाचा)

2. जग वरचेवर वाईट’च’ होत चाललंय आणि जगाचा अंत जवळ आलाय! (येथे वाचा)

या लेखात आपण तिसऱ्या मोठ्या गैरसमजाबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रा. हांस रोस्लिंग यांनी जगभरातल्या विद्वान लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी एक प्रश्न विचारला की, “तुम्हाला काय वाटतं, येत्या काळात जगाची लोकसंख्या वाढेल, कमी होईल की आहे तेवढीच राहिल?” जवळपास सर्वच लोकांनी एका सुरात असं सांगितलं, की जगाची लोकसंख्या फक्त आणि फक्त वाढतेच आहे आणि ती अशीच वाढत राहिली तर नैसर्गिक संसाधनांचे साठे/स्त्रोत आटून जातील आणि प्रलयकारी परिस्थिती निर्माण होईल. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की तिसरा मोठा गैरसमज (Mega Misconception) काय आहे.

3. जगाची लोकसंख्या फक्त आणि फक्त  वाढतेच आहे. 

ही सत्य परिस्थिती आहे, की लोकसंख्येचा आजचा कल वाढताच आहे. येत्या 13 वर्षांत अजून 1 अब्ज लोकांची भर पडणार आहे. वाढती लोकसंख्या हे सत्यच आहे, तो गैरसमज नाहीये. पण लोकसंख्या “फक्त आणि फक्त वाढतच जाणार आहे” हा मात्र गैरसमज आहे. याचाच अर्थ असा, की जर आपण काहीच केले नाही, तर लोकसंख्या वाढतच जाईल आणि म्हणून आपण काहीतरी नियम बनवून लोकसंख्येची वाढ थांबवली पाहिजे वा आटोक्यात आणली पाहिजे; हाच मोठा गैरसमज आहे. याचे कारण आहे: फक्त चढता आलेख पाहण्याची आपली सवय/वृत्ती.

मिनू जन्मली तेव्हा साधारण एक फूट उंचीची होती, परंतु सहाच महिन्यात तिची उंची 1.6 फूट झाली. जवळपास 6 इंच उंची 6 महिन्यात वाढली! याला जर आपण आलेखात मांडले आणि सरळ रेषा काढली तर तिच्या तिसऱ्या वाढदिवसाला ती जवळपास 4 फूट उंच असेल आणि दहाव्या वाढदिवसापर्यंत 10 फुटांच्या वर उंची जाईल. सरळ रेषेतला आलेख येथे स्पष्टपणे बिनकामाचा ठरतो. हे आपण मान्यही करतो, कारण आपण आपल्या आधीच्या पिढ्यांपासून लहान मुलांची वाढ पाहत आलोय आणि अनुभवाने शिकलो आहोत की लहान मूल कसं वाढतं.

1920 सालापासून लोकसंख्या वाढीचा दर जगभरात कसा बदलतोय हे खालील आलेख पाहून सहज लक्षात येईल. लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असताना दूरच्या भविष्यात लोकसंख्या वाढतच जाईल हे कसं शक्य आहे?

संयुक्त  राष्ट्रसंघातील लोकसंख्या तज्ज्ञ मंडळी लोकसंख्येच्या भविष्यातल्या वाढीबद्दल अनुभवी आहेत. कारण या आधीही त्यांनी ही गणितं केली आहेत आणि ती नेहमीच खरी ठरली आहेत. त्यांच्या मते हा आलेख खाली दिल्याप्रमाणे असेल. लोकसंख्या वाढतेय यात वादच नाहीये, ती एका स्तरापर्यंत वाढत वाढत जाऊन स्थिर होईल आणि हळूहळू कमी होत जाईल असंच दिसतंय. आपली कल्पना आणि सत्य परिस्थिती यांची तुलना खालील चित्रात पहा.

लोकसंख्येची वाढ का थांबेल?

1950 च्या आसपास जगभरात एक स्त्री सरासरी 5 मुलांना जन्माला घालत असे. 1965 नंतर हीच संख्या घसरु लागली. मागच्या 50 वर्षात हीच संख्या जगभरात सरासरी 2.5 पेक्षाही खाली आली आहे. हे सगळं बाकी सुधारणांना समांतर घडत होतं. कोट्यावधी लोक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून (Level 1) जेव्हा वरच्या स्तरांमध्ये सरकले, तेव्हा त्यांनी कमी मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतला. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे बाल कामगारांची गरज संपत येते आणि बालमृत्युदर कमी झाल्यामुळे आहे त्या मुलांच्या जगण्याबद्दल खात्री वाटू लागते. तसेच वरच्या स्तरांमध्ये शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण आणि संगोपन मिळणं हे छोट्या कुटुंबामध्येच शक्य आहे, हे पालकांच्या लक्षात येतं. एका स्त्रीमागे किती मुलं आहेत, ही संख्या वरचेवर कमीच होत जाईल कारण स्त्रियांच्या शिक्षणाचा टक्का वाढतोय. लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधकं सर्वांना उपलब्ध होत आहेत. जर हे असंच होत राहिलं, तर नाट्यमयरीत्या लोकसंख्या वाढ थांबेल, अशी आशा वाटते. खालील लेखामध्ये हे स्पष्टपणे पहाता येईल.

अधिक माहितीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत वेबसाईटवरील लिंक वाचा.

जितके लोकं जास्त जगतील तितकी लोकसंख्या कमी होईल: (A Paradox: More Survivors lead to  Lesser population)

स्तर क्रमांक (Level) 2, 3 आणि 4 मध्ये मोडणाऱ्या, जगभरातल्या सगळ्या धर्मातल्या, देशातल्या कुटुंबांचा अभ्यास केला तर असं निदर्शनास येतं की येथील कुटुंबांमध्ये “हम दो, हमारे दो” ही व्याख्या पाहायला मिळते. यात इराण, भारत, मेक्सिको, श्रीलंका, बांगलादेश, ट्युनिशिया इत्यादी देशांचा देखील समावेश आहे. याउलट, टोकाच्या गरिबीमध्ये (extreme poverty) जगणाऱ्या कुटुंबांमध्ये मात्र सदस्यसंख्या जास्त आहे. तेथे एका घरात सरासरी 5 मुलं असल्याचं आढळतं. या घरांमध्ये 5 वर्ष वयाच्या आतलं एक तरी मूल दगावतं. हे प्रमाण खुपच लाजवणारं असलं तरी बरचसं आटोक्यात आलेलं आहे. म्हणजेच कुटुंबाचं उत्पन्न वाढलं, की कुटुंब सदस्यांची संख्या कमी होते. हा मुद्दा खालचा चार्ट पाहून अजून चांगला समजेल.

कोट्याधीश बिल आणि मेलिंडा गेट्स हे दाम्पत्य एक लोककल्याणकारी संस्था चालवतात. संस्थेमार्फत वर्षाकाठी लाखो डॉलर्स अतिशय हलाखीत जगणाऱ्या, अत्यंत गरीब मुलांना प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी खर्च केले जातात. या संस्थेला जगाच्या कानाकोपऱ्यातून हुशार, समंजस आणि आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या लोकांची पत्र येतात आणि त्यात बऱ्याचदा एक गोष्ट लिहिलेली असते की “गरीब मुलांना आरोग्य सुविधा देऊन वाचवू नका, ते जगत राहिले तर आपल्या ग्रहावर लोकसंख्येचा भार उगीच वाढतोय आणि याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागेल.” अर्थात ते निर्मळ हेतू मनात बाळगूनच इतक्या तळमळीने लिहितात. वाचतांना हे अगदी बरोबर वाटतंय, हो ना? नाही, हे साफ चुकीचं आहे. हाच तो विरोधाभास (paradox) आहे. हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

जर पुरेशा आरोग्य सुविधांअभावी आणि गरीबीमुळे बालमृत्यू होतात, हे आपल्याला माहित आहे तर याचाच अर्थ अशा कुटुंबांची सदस्यसंख्या चढी राहते. मजुरी करण्यासाठी म्हणून आणि सगळीच मुलं जगण्याची शाश्वती नाही म्हणून शक्य तेवढी जास्त मुलं जन्माला घातली जातात. याउलट, मुलं जगण्याची शाश्वती वाटू लागली की आपोआपच कुटुंबाची सदस्यवाढ आटोक्यात येईल. शिक्षणामुळे रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होतील आणि मिळकत उंचावत जाईल. म्हणजेच, गरीब मुलांना न वाचवणं बरोबर वाटत असलं तरी नेमकं त्याच्या उलटी (विरुद्ध) बाजू बरोबर आहे.

या गरीब मुलांना वाचवण्यात आपण जेवढा उशीर करु, तेवढ्याच वेगाने लोकसंख्या वाढती राहील. अत्यंत हलाखीत, गरिबीत राहणारी एक पिढी त्यांच्याहीपेक्षा मोठ्या पिढीला जन्म घालत असते. गरीबीचे निर्मूलन आणि खालच्या स्तरांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा (उदा. शिक्षण, आरोग्य, गर्भनिरोधक इत्यादी) हीच काय ती वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याची प्रमाणसिद्ध पद्धत आपल्याला माहिती आहे. राहिली गोष्ट पुढच्या पिढीसाठी पृथ्वीच्या संसाधनांचा जपून वापर करण्याची; तर जे लोक जन्मलेही नाहीत त्यांच्यासाठी आपण एवढी काळजी करतोय आणि जे आपल्या डोळ्यांसमोर मरत आहेत त्यांचा मात्र आपण बळी द्यायला तयार आहोत! इतकी क्रूर मानसिकता एक माणूस म्हणून मला तरी पटत नाही. आणि म्हणूनच, बालमृत्युदर रोखण्यासाठी फक्त माणुसकी म्हणून नाही तर येणाऱ्या काळात लोकसंख्या आटोक्यात राहावी म्हणून ही, आपण शक्य त्या प्रकारे मदत केलीच पाहिजे. Thus, more survivors today will lead to lesser population in future.

आपली तथ्यप्रियता कशी जपाल- फसव्या आलेखापासून बचाव कसा करावा? 

“Simply remember that Curves naturally come in lot of different shapes.”

आलेख (Graphs) किंवा तक्ते (Charts) हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जेव्हा आलेखीय सादरीकरण (Graphical Representation) करायचं असतं, तेव्हा उपलब्ध माहितीचा आधार घेऊनच तक्ते बनवावेत. जगातले विविध महत्वाचे  ट्रेंड्स (trends) सरळ रेषीय नसून “S” सारखे, “Hump”सारखे, घसरगुंडीसारखे, दुपटीने वाढणाऱ्या रेषेसारखे, Parabolic, Hyperbolic अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वक्रतेने (Curves) दर्शवण्यात येतात.

जसजसं उत्पन्न वाढतं तसतसं लोकांचं दरवर्षी प्रवास करण्याचं अंतर दुपटीने वाढतं आणि पर्यायाने पेट्रोल/डिझेलवर होणारा खर्च ही दुपटीने वाढतं. तसेच कार्बनचं उत्सर्जन देखील दुप्पट होत जातं. स्तर 4 (Level 4) वरील लोक एक तृतीयांश उत्पन्न फक्त प्रवासावर खर्च करतात. याचाच अर्थ त्यांचे कार्बन उत्सर्जन देखील बाकी लोकांपेक्षा जास्त आहे. हा ग्राफ “Doubling Lines” या कक्षेत मोडतो.

Level 1 मधून Level 2 वर गेलेल्या लोकांचे दाताचे आरोग्य अत्यंत खालावलेले असते. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे गोड पदार्थांवर खर्च करण्याची ऐपत असते. जसजसे वरच्या स्तरांमध्ये जाऊ तसतसे लोकांमध्ये जागरुकता वाढते आणि Level 4 वरच्या लोकांचे दातांचे आरोग्य सुधारलेले दिसते. हा ग्राफ “Hump” या प्रकारात मोडतो.

जसजसे उत्पन्न वाढत जाते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, तसतसे कुटुंबाची सदस्यसंख्या कमी कमी होत जाते. याचाच अर्थ उच्च उत्पन्न गटातल्या स्त्रिया निम्न उत्पन्न गटातल्या स्त्रियांपेक्षा कमी मुलांना जन्म घालतात (babies per woman). हा ग्राफ घसरगुंडी (Slide) सारखा दिसतो.

उत्तरार्ध:

गॅपमायिंडर संस्थेने 2017 मध्ये अतिशय महत्वाच्या विषयांवर जगभरातील श्रीमंत देशांतील हुशार लोकांचे समज गैरसमज तपासले. त्यातून अगदी मजेशीर आणि चिंताजनक माहिती समोर आली. इतकी चिंताजनक की या हुशार माणसांपेक्षाही चिम्पांझी माकडांनी जास्त बरोबर उत्तरं दिली. जर तुम्हालाही या अभ्यासाबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ पहा.

तथ्य व आकडेवारीवर आधारित असे अधिक ग्राफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

(फॅक्ट्फुलनेस या हांस रोज्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित.)

टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.

संबंधित ब्लॉग:

BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी

BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.