
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर अजित पवारांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीसाठी चार्टर्ड विमानाने निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले.

हा अपघात इतका भीषण होता की विमानाला भीषण आग लागली. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. अजित दादांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमचा नेता गेला, अशा शब्दात प्रतिक्रिया देत कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसत आहेत. बारामतीमधील रुग्णालयाबाहेर हजारो समर्थकांनी गर्दी केली आहे. सध्या रुग्णालयाचा संपूर्ण परिसर हुंदक्यांनी भरून गेला आहे.

दादा माणूस गेला अशी भावना व्यक्त केली जात आहे. तसेच प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रशासनावर पकड असलेला आणि पहाटेपासून कामाला लागणारा लोकनेता हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक धगधगता सूर्य मावळला असून, नियतीने राज्याचा एक कार्यक्षम लोकनेता हिरावून नेला आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.

अजित दादांचे हे अकाली जाणे राज्याच्या विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची मोठी हानी मानली जात आहे, असेही म्हटले जात आहे.