
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. भारतालाही जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात या युद्धाची झळ बसली आहे. भारतावर एका प्रकारे मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. असे असतानाच आता नागरिकांना आणखी मोठा धक्का बसला आहे.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतात नैसर्गिक वायू आणि एलपीजी गॅसचा तुटवडा भासतो आहे. भारतात एलपीजी गॅसची टंचाई वाढली आहे. आता संपूर्ण भारतात खाद्यतेलाची किंमतही वाढली आहे. खाद्यतेल साधारण पाच ते दहा रुपयांनी महागले आहे.

एकीकडे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढलेली आहे. दुसरीकडे व्यावसायिक गॅसही वेळेवर मिळत नाहीये. त्यामुळे औद्योगिक पातळीवरही भारताचे मोठे नुकसान होत आहे. आता खाद्यदेलाबाबत चिंता वाढवणारी ही नवी माहिती समोर आली आहे.

गेल्या महिनाभारत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 24 फेब्रुवारी 2026 ते 24 मार्च 2026 या एका महिन्याच्या काळात सूर्यफुल तेल 175 रुपयांवरून 185 रुपये प्रति किलो झाले आहे. पाल्म ऑईल पाच रुपयांनी महागले आहे.

सोयाबीन तेलामध्येही प्रत्येक किलोमागे 4 रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाणा तेल, मोहरीच्या तेलाच्या दरात अंदाजे 3 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. युद्धाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात खाद्यतेलाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.