
झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' या गाजलेल्या मालिकेत पृथ्वीची भूमिका साकारलेला अभिनेता संजय गगनानी याने 2021 मध्ये पूनम प्रीतशी लग्न केलं होतं. लग्नापूर्वी संजय आणि पूनम हे जवळपास नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तीन वर्षांच्या लग्नानंतर आता ही जोडी विभक्त होणार असल्याचं कळतंय. संजय आणि पूनम एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचं समजतंय. याविषयी अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

संजय आणि पूनम यांच्या वैवाहिक जीवनात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. संजयने त्याच्या ओळखीच्या काही वकिलांकडून घटस्फोटाबद्दल सल्ला मागितला आहे. पत्नीपासून विभक्त होण्यासाठी तो घटस्फोटाच्या प्रक्रियेबद्दल विचारपूस करत असल्याचं कळतंय.

संजय आणि पूनम यांच्यात नेमकं कुठे बिनसलं, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 24 एप्रिल रोजी संजयने त्याच्या इन्स्टग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. 'जितकं मी प्रेम करतो, तितकंच मी वेगळं राहण्यातही सक्षम आहे', अशा आशयाची ही पोस्ट होती. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली होती.

संजय आणि पूनम यांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झाली होती. फेसबुकवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर संजयने पूनमला मुंबईत पुढील करिअरसाठी बोलावलं. नऊ वर्षे सोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.