राजीनामा घेऊन काय फायदा होणार? या आधीही… ममता कुलकर्णीने घेतली धर्मेंद्र प्रधान यांची बाजू
नाशिक कुंभमेळा आणि NEET पेपर लीक प्रकरणावर ममता कुलकर्णी यांनी आपली थेट भूमिका जाहीर केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर केलं मोठं विधान. काय म्हणाल्या ममता?

अभिनेत्री ते साध्वी असा प्रवास केलेल्या ममता कुलकर्णी यांनी नाशिक कुंभ मेळा आणि NEET पेपर लीक प्रकरणावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. महिला आखाड्यांना नाशिक कुंभमध्ये स्थान न देण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तो 'मूर्खपणाचा निर्णय' असल्याचे म्हटले. तसेच, त्या स्वतः नाशिक कुंभ मेळ्यात पवित्र स्नानासाठी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ममता कुलकर्णी यांनी कुंभ मेळ्यात महिलांनाही समान संधी मिळायला हवी असे मत व्यक्त केले. धार्मिक परंपरा आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये महिला आखाड्यांनाही योग्य स्थान मिळणे आवश्यक असून, त्यांना वगळणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी NEET पेपर लीक प्रकरणावरही भाष्य केले. या प्रकरणाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत त्यांनी केवळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागून प्रश्न सुटणार नसल्याचे म्हटले. 'यापूर्वीही विविध परीक्षांचे पेपर लीक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही' असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठिंबा देत ममता कुलकर्णी यांनी या प्रकरणात केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

नाशिक कुंभ मेळ्यात महिला आखाड्यांच्या सहभागाचा मुद्दा आणि NEET पेपर लीकसारख्या संवेदनशील विषयांवरील त्यांच्या विधानांमुळे ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यांवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.