मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या भाऊबीजेच्या आठवणी
मालिकेतील कलाकारांनी भाऊबीजेच्या आठवणी सांगितल्या आहेत. 'नवरी मिळे हिटलरला', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'पारू', 'पुन्हा कर्तव्य आहे' यांसारख्या मालिकेतील कलाकारांनी भाऊबीजेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'नवरी मिळे हिटलरला'मधील लीला म्हणजेच वल्लरी विराज म्हणाली, "आम्ही इतक्या वर्षांपासून भाऊबीज साजरी करत आहोत. पण लहानपणीची भाऊबीज आणि आताच्या भाऊबीज साजरा करण्याच्या पद्धतीत एक मोठा फरक मला जाणवलाय. एक म्हणजे लहानपणी आम्ही एकत्र राहायचो तर मज्जा करायचो पण आता मी 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेसाठी शूटसाठी घरापासून थोडी लांब राहते. त्यामुळे मला भाऊबीजेची खूप जास्त ओढ आहे. पहिले आई-बाबा गिफ्ट आणून द्यायचे तेच मी भावाला द्यायची. पण आता मी स्वतः जाऊन त्याच्यासाठी त्याला हवं ते गिफ्ट आणणार आहे."

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधील लाडकी नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे म्हणाली, "मला चुलत भाऊ आहेत. डोंबिवलीत माझे मावस आणि आत्ते भाऊ आहेत, तेव्हा आम्ही भाऊबीज तिकडेच साजरी करणार आहोत. पण अनेक वर्ष शिक्षणासाठी बाहेर राहिल्यामुळे बरेच वेळा भाऊबीज करता आली नाही. जेव्हा आम्ही एका शहरात असतो आणि आम्हाला सुट्टी असते आम्ही न चुकता एक घर ठरवतो आणि सर्व भावंडं एकत्र जमतो, तिथे आम्ही एकत्र भाऊबीज साजरी करतो. आम्ही जवळपास 20-25 भावंडं आहोत. माझे भाऊ माझ्यापेक्षा लहान आहेत, मी त्यांना सांगते की तुम्हाला जे हवे त्याची मला लिंक पाठवा आणि मी त्यांच्यासाठी ते ऑर्डर करेन."

नितळ स्वभाची प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेली 'पारू' म्हणजेच शरयू सोनावणे म्हणते, "शाळेत असे पर्यंत नियमितपणे रक्षाबंधन, भाऊबीज साजरी होत होती पण आता कामामुळे आम्ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे प्रत्येकवेळी एकत्र येऊन भेटणं शक्य होत नाही. इतर भावंडं तरीही भेटतात पण शूटिंगमुळे माझं नक्की नसतं. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना साजरी केलेली भाऊबीज मी प्रचंड मिस करते आणि मला नेहमी धाकधूक लागलेली असते की मी भावंडाना भेटू शकेन की नाही. माझा भाऊ माझ्याकडे जे मागेल ते मी त्याला देईन."

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर म्हणाली, "आमच्याकडे भाऊबीज म्हणजे एक मोठा मेळावा असतो. माझ्या 5 आत्या आणि 3 काका आहेत. पहिल्यापासूनच सर्व आमच्या घरी यायचे. तेव्हा चाळीत घर होतं आणि त्या चाळीतल्या लहान खोलीत आम्ही जवळ पास 30-35 लोकं खूप आनंदात भाऊबीज साजरी करायचो. आता आम्ही टॉवरमध्ये राहतो आणि आता ही तसेच सर्वजण आमच्या घरी येतात आम्ही खूप खेळतो, गाण्यांच्या भेंड्या लागतात, कराओके होतो, डीजे नाईट होते. प्रचंड धमाल-मस्ती करतो."

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेमधील आकाश म्हणजे अक्षय म्हात्रेनं सांगितलं, "माझ्या सख्या बहिणी नाहीत, पण लहानपणी भाऊबीजेची जास्त मज्जा तेव्हा यायची जेव्हा आईचे भाऊ यायचे कारण त्यादिवशी घरी पार्टीचा, धमाल, मस्तीचा माहोल असायचा. मामांसोबत मी फटाके फोडायला जायचो ती मज्जाच वेगळी होती. आता भाऊबीजेचा फरक एवढाच कि लहान असताना माझ्या चुलत मावस बहिणींसाठी आई-बाबा गिफ्ट्स आणायचे आता मी स्वतः आणतो."