
इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने पश्चिम आशियाई देशांना कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची कमतरता भासत आहे. परिणामी भारतासही पाकिस्तानमध्येही उर्जासंकट निर्माण झाले आहे.

पाकिस्तानमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव चांगलाच वाढला आहे. या महागाईमुळे तेथील लोकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पाकिस्तानी नागरिकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

असे असतानाच आता पाकिस्तानने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांपर्यंत कापात केली जाणार आहे. तशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

शाहबाज शरीफ यांच्या घोषणेनुसार शासकीय कर्मचारी तसेच शासनाची निगडित असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा पगार 5 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय गेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानात इंधन चांगलेच महागले आहे. त्यामुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढला आहे. हा दबाव कमी व्हावा आणि महागाई नियंत्रणात राहावी यासाठी पाकिस्तानने हा पगार कपातीचा निर्णय घेतला आहे. पगार कपातीतून मिळालेल्या निधीचा वापर लोकांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे.