Agni 4 : संपूर्ण पाकिस्तानसह चीनची झोप उडवणारी बातमी! ‘अग्नी-4’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
India Missile Test : आज ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) मधून 'अग्नी-4' या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली.

भारताची लष्करी क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आज ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) मधून ‘अग्नी-4’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) यांच्या देखरेखीखाली पार पडली. चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राचे सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. यामुळे भारताचे शत्रू चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे.
संरक्षण मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. याच मंत्रालयाने म्हटले आहे की, अग्नी-4 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची स्ट्रॅटेजिक डिटेरेन्स क्षमता आणखी मजबूत झाली आहे. आजच्या चाचणीत अग्नी 4 क्षेपणास्त्राने नियोजित मार्गाने उड्डाण करत सर्व लक्ष्ये अचूकपणे गाठली. या चाचणीमुळे भारताच्या अण्वस्त्र-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मालिकेची ताकद पुन्हा एकदा समोर आली आहे.
4,000 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता
अग्नी-4 हे दोन टप्प्यांचे घन इंधनावर चालणारे इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (IRBM) आहे. याची मारक क्षमता सुमारे 4,000 किलोमीटर आहे. सुमारे 20 मीटर लांब आणि 17,000 किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र तसेच पारंपरिक वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांनी विकसित केले असून भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) यांनी त्याची निर्मिती केली आहे. याचे प्रक्षेपण रोड मोबाइल लॉन्चरमधून करता येते, त्यामुळे त्याची तैनाती जलद आणि अधिक प्रभावी ठरते.
स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडची देखरेख
भारताच्या अण्वस्त्र वितरण प्रणालीची जबाबदारी असलेल्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) ने ही चाचणी पार पाडली. ऑपरेशनल तयारीची खात्री करण्यासाठी SFC नियमितपणे अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रांच्या युजर ट्रायल्स आयोजित करत असते. यापूर्वीही 2022 आणि 2024 मध्ये अग्नी-4 ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.
भारताच्या ताकदीत वाढ
भारत सध्या आपल्या क्षेपणास्त्र क्षमतांचे आधुनिकीकरण करत आहे. अग्नी-1 ते अग्नी-5 या मालिकेमुळे भारत विविध अंतरावरील लक्ष्यांवर अचूक प्रहार करण्यास सक्षम आहे. अग्नी-4 हे अग्नी-3 आणि अग्नी-5 यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जाते. हे क्षेपणास्त्र प्रादेशिक तसेच दूरवरील संभाव्य धोक्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे आता भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे.
