
टीम इंडिया अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर 22 जानेवारीला या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यात काही विक्रमांवर टीम इंडियाच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. काय ते जाणून घ्या.

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात पाच षटकार मारताच त्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 150 षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरेल. सध्या त्याच्या नावावर सध्या 145 षटकार आहेत. या शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (146) देखील आहे.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही षटकारांचे शतक पूर्ण करण्याच्या जवळ आहे. हार्दिक पांड्याच्या नावावर सध्या 88 षटकार आहेत. संपूर्ण मालिकेत 12 षटकार मारून तो टी20 क्रिकेटमध्ये षटकारांच शतक मारणारा चौथा भारतीय ठरेल.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही शतकाच्या जवळ आहे. त्याने 60 टी20 सामने खेळले असून 95 बळी घेतले आहेत. आता या मालिकेत 5 बळी घेऊन विकेटचं शतक पूर्ण करू शकतो. ही कामगिरी करणारा हिला भारतीय गोलंदाजही ठरू शकतो.

अर्शदीप सिंग पहिल्याच सामन्यात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकतो. यासाठी त्याला पहिल्याच सामन्यात 2 विकेट्सची गरज आहे. सध्या युझवेंद्र चहलच्या नावावर 96 विकेट आहेत. तर अर्शदीपच्या नावावर 95 विकेट आहेत.

संजू सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. सध्या 810 धावांवर आहे. या मालिकेत 190 धावा करून हा पल्ला गाठू शकतो. जर त्याने तसं केलं तर तो टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा 12वा भारतीय फलंदाज ठरला.

दुसरीकडे, षटकारांचं अर्धशतक पूर्ण करण्याची संधीही संजू सॅमसनकडे आहे. जर त्याने 4 षटकार मारले तर तो टी20 मध्ये 50 षटकार पूर्ण करेल. आता तो ही किमया पहिल्याच सामन्यात करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.