राज्याच्या राजकारणात खळबळ! भाजप नेत्याने तडकाफडकी पक्ष सोडला, राजीनामा पत्रात काय?
BJP Leader Resigns : भाजप हा राज्यातील मोठा पक्ष आहे, मात्र आता या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एका नेत्याने आपल्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे बदल पहायला मिळाले आहेत. दिल्लीत नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनात लाठीचार्जदेखील झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. अशातच आता या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यातील भाजपच्या एका नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हा नेता कोण आहे त्याच्याकडे काय पद होतं? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमळनेरच्या शहराध्यक्षांचा राजीनामा
जळगावच्या अमळनेर येथील भाजप शहराध्यक्ष तथा नगरपरिषदचे माजी सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसेने दडपण्याचा प्रयत्न तसेच भाजपाचे विद्यमान धोरण यामुळे व्यथित आणि दुःखी झाल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. पाटील यांचा राजीनामा हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
राजीनाम्याचे कारण काय?
श्याम पाटील यांनी राजीनाम्याचे पत्र भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमधील विद्यमान सर्व पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं श्याम पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. माझ्यासाठी पद प्रतिष्ठा महत्त्वाचे नसून विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे हित महत्वाचे आहे. मी लवकरच राजकारणातील पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही श्याम पाटील यांनी म्हटले आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन मागे
नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्यानंतर आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. असं असलं तरी आगामी काळात पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा कॉकरोच जनता पार्टीकडून देण्यात आला आहे. ही पार्टी आता देशातील विविध भागात जाऊन तेथील मुद्यांसाठीही लढा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या पार्टीच्या आगामी आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
