आणखी किती बळी हवेत?, या मंत्र्यांना पायउतार करा; भाजपचा संताप
विरार येथील घटना ही नॅशनल न्यूज नाही, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. (bjp slams rajesh tope over virar covid hospital fire incident)
मुंबई: विरार येथील घटना ही नॅशनल न्यूज नाही, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी हवे आहेत?, असा संतप्त सवाल करतानाच या मंत्र्यांना पायउतार करा, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. (bjp slams rajesh tope over virar covid hospital fire incident)
प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा संताप व्यक्त केला. आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवाल दरेकर यांनी केला आहे. राज्यातील आघाडी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या आहेत. त्यामुळेच हे लोक बेताल बडबड करत आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याऐवजी यांना टीव्हीवर चमकायचं पडलं आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.
चांडाळ सरकार
राज्यातील मविआ सरकार हे चांडाळ सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी किती बळी घेणार आहे. हे सरकार नॅशनल न्यूजची वाट पाहत आहे का? वायफळ बडबड करणाऱ्यांना तात्काळ पायउतार करा, असा खोचक सल्ला दरेकर यांनी दिला.
टोपे यांचं विधान असंवेदनशीलतेचं लक्षण
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विरारमधील घटनेवर दु:ख व्यक्त केलं. गेल्या सहा महिन्यातील ही पाचवी घटना आहे. प्रत्येक घटनेनंतर आपण चौकशी करू असं सांगतो. चौकशी केली पाहिजे. प्रत्येक वेळेस फायर ऑडिट करू असंही सांगितलं जातं. पण केलं जात नाही. रुग्णालयांवर ताण आहे. नवी व्यवस्था करायला हवी. सरकारने हॉस्पिटलला मदत केली पाहिजे. विरार ते नाशिकपर्यंतच्या घटना भयानक आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल संवेदना आहे. विरारच्या घटनेची चौकशी करून या घटनेच्या मुळाशी जायला हवं. पुन्हा अशी घटना घडणार नाही, यासाठी प्रभावी पावलं उचलली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी राजेश टोपे यांच्यावरही टीका केली. टोपे यांचं विधान असंवेदनशीलतेचं लक्षण आहे. त्यांनी कोणत्या मानसिकतेत हे विधान केलं माहीत नाही. अशा घटनांमध्ये संवेदनशील असावं. अशा प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री साहेब आता तरी डोळे उघडा
भाजप नेते प्रसाद लाड यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली. विरारची दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. यात 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. सरकार दुर्लक्ष करून काम करत आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना कुठलीही एसओपी किंवा कुठलीही यंत्रणा लावायला सरकार तयार नाही. लोकांना कोरोना काळात बेड मिळत नाहीत आणि बेड मिळाल्यास रुग्णांचा होरपळून मृत्यू होतोय हे अतिशय क्लेशदायक आहे, असं लाड यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री साहेब आता तरी डोळे उघडा. ही यंत्रणा तुम्हाला झेपत नाही हे मान्य करा, या घटनांना आवर घालायला हव्यात. त्या थांबायला हव्यात, असं लाड म्हणाले.
रुग्णालयांचं फायर ऑडिट करा
भाजपचे खासदार मनोज कोटक यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्ण दगावत आहेत. भांडूपच्या आगीनंतर आम्ही फायर ऑडिटची मागणी केली होती. मात्र आजही लोकोंना नाहक त्रास दिला जातोय. सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करायला हवं होतं. भांडूप, भंडारा, नागपूर आणि नाशिकनंतरची ही सर्वात मोठी घटना आहे, असं कोटक म्हणाले. (bjp slams rajesh tope over virar covid hospital fire incident)
VIDEO | महाफास्ट न्यूज 100 | MahaFast News 100 | 7 AM | 23 April 2021 https://t.co/nO3rBBqcnP #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021
संबंधित बातम्या:
विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, 13 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
(bjp slams rajesh tope over virar covid hospital fire incident)