CM Eknath Shinde : ‘मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायलाही वेळ होता’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला

| Updated on: Aug 02, 2022 | 6:14 PM

सर्वांना भेटायला माझ्याकडे वेळ होता. मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता, अशा शब्दात शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. तसंच मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही. एवढं काम मी माझ्या मतदारसंघात केल्याचा दावाही शिंदे यांनी केलाय.

CM Eknath Shinde : मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायलाही वेळ होता, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच शिवतारे यांच्या मतदारसंघात आले होते. त्यावेळी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला. या मेळाव्याला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. सर्वांना भेटायला माझ्याकडे वेळ होता. मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता, अशा शब्दात शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. तसंच मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही. एवढं काम मी माझ्या मतदारसंघात केल्याचा दावाही शिंदे यांनी केलाय.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज याठिकाणी येण्याचं मला भाग्य लाभलं. छत्रपती संभाजीराजे, आचार्य अत्रे यांची ही जन्मभूमी आहे. मी काम करणारा माणूस आहे. फायली फिरतात मला त्यात रस नाही. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेचं सरकार आता आलं आहे. आपण निवडणूक लढवत असताना एकीकडे मोदींचा तर दुसरीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला होता. त्यामुळेच जनतेनं आपल्याला पूर्ण बहुमत दिलं होतं, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगवलाय.

‘थोडं मागे पुढे झालं असतं तर आमचा कार्यक्रमच झाला असता’

शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळालं? तडीपारीची कारवाई तेवढी करण्यात आली. अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारलं नाही. सामान्य शिवसैनिकाची ही भावना होती. आम्ही उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसायचं का? नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चार नंबरवर फेकली गेली. शिवसेना भाजपचं सरकार आलं असतं तर आज काँग्रेस, राष्ट्रवादी कुठे राहिली असती, ते औषधालाही पुरले नसते. थोडं जरी मागे पुढे झालं असतं तर आमचा कार्यक्रमच झाला असता. काही लोकांना वाटत होतं या लोकांनी राजकीय आत्महत्या केली. आम्हाला दीपक केसरकर नावाचा संत माणूस भेटला. अगोदर तो माणूस अडगळीत होता, तुम्ही तो शोधून आणला. आम्ही गद्दार, बंडखोर असतो तर तुम्ही एवढ्या उन्हात आला असता का? आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

‘विश्वासघात कुणी केला हे जनता ठरवेल’

शिवसैनिकांनी अडीच वर्षे त्रास भोगला आहे. एकाही शिवसैनिकाच्या केसाला आता धक्का लागू देणार नाही. राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. मोदींनी तसं आश्वासन दिलंय. आम्ही अडीच वर्षांपूर्वी जे करायला हवं होतं ते आता केलं. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणायला पाहिजे होतं ते आम्ही केलं. मग विश्वासघात कुणी केला? आम्ही केला का? हे जनता ठरवेल, असंही शिंदे म्हणाले. तसंच गुंजवणीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 50 कोटी दिले जाणार. उरळी पाणी पुरवठा योजनेसाठी 25 कोटी रुपये दिले जाणार. बाजारसमितीसाठी ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील. कुठल्याही प्रकल्पाचा निर्णय तुमच्या संमतीने घेतला जाईल. पुरंदरचं विमानतळ दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण आमचं सरकार आल्यावर ते थांबलं आहे. एकनाथ शिंदे तुमचा हक्काचा माणूस आहे, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी दिला.