CM Eknath Shinde : मी साक्षीदार होतो… सिल्लोडमध्ये एकनाथ शिंदेंनी युती तुटल्याचा घटनाक्रम सांगितला! ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Jul 31, 2022 | 9:39 PM

एकनाथ शिंदे आज आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोडमध्ये होते. त्यावेळी त्यांनी 2019 मध्ये नेमकं काय घडलं? शिवसेना, भाजपची युती कशी तुटली? त्याला कारणीभूत कोण? याबाबत गौप्यस्फोट केलाय.

CM Eknath Shinde : मी साक्षीदार होतो... सिल्लोडमध्ये एकनाथ शिंदेंनी युती तुटल्याचा घटनाक्रम सांगितला! ठाकरेंवर निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: Twitter
Follow us on

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनं शिवसेना दुभंगली. शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार गेले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. ठाकरे गटाकडून शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातोय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोडमध्ये होते. त्यावेळी त्यांनी 2019 मध्ये नेमकं काय घडलं? शिवसेना, भाजपची युती कशी तुटली? त्याला कारणीभूत कोण? याबाबत गौप्यस्फोट केलाय.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही शिवसेना आणि भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली होती. बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता. हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात होतो. त्यामुळे जनतेने भाजपचे 106 आमदार आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले. पण, नंतर काय झालं? काही लोकाची वक्तव्ये आली, आम्हाला अनेक दरवाजे मोकळे आहेत. ती कशाची सुरुवात होती? असा सवाल एकनाथ शिंदेंनी केलाय.

‘आम्ही सगळे म्हणालो होतो, अशी आघाडी करु नका’

इतकंच नाही तर ‘मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी त्यावेळी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करु. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. पण तसं झालं नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, अशी आघाडी करु नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झालं’, असा खळबळजनक खुलासा एकनाथ शिंदेंनी केलाय.

मग आता सांगा खरं कोण?

इतकंच नाही तर शिंदे म्हणाले की, मी आता भाजपच्या प्रमुख नेत्यांना भेटतो. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, आम्ही नितीश कुमार यांच्या जागा कमी असूनही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. यातच ओळखून जावा नक्की काय आहे. मला पंतप्रधान, गृहमंत्री म्हणाले की तुमच्याकडे 50 लोक असतील तर मुख्यमंत्रीपद देऊ शकतो. तर मग आम्ही शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नसता का. मग आता सांगा खरं कोण? असा सवालही शिंदे यांनी केलाय.