AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विखेंचा राजीनामा स्वीकारला, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, अशोक चव्हाणांची घोषणा

अहमदनगर : काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात ऐननिवडणुकीच्या तोंडावर मोठं ग्रहण लागलंय. पक्षाचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलाय, तर नगरचे जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनीही पदाचा राजीनामा दिला. दोघांचाही राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उद्या शिर्डी मतदारसंघासाठी […]

विखेंचा राजीनामा स्वीकारला, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, अशोक चव्हाणांची घोषणा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM
Share

अहमदनगर : काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात ऐननिवडणुकीच्या तोंडावर मोठं ग्रहण लागलंय. पक्षाचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलाय, तर नगरचे जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनीही पदाचा राजीनामा दिला. दोघांचाही राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उद्या शिर्डी मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये सभा आहे, त्यापूर्वीच काँग्रेसला हे धक्के बसले आहेत.

अंतर्गत वादातून विखे समर्थक असलेले करण ससाने यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. विखे पाटलांनी अजून पक्ष सोडलेला नाही. पण त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत, त्यांनी पक्षाच्याच विरोधात काम केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यावर विचार करुन निर्णय घेऊ, असं चव्हाण म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डीच्या उमेदवारासाठी संगमनेरमध्ये उद्या सभा होत आहे. त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु उफाळून आले आहेत. राहुल गांधींच्या सभेसाठी विखे पाटलांना निमंत्रण दिलं असून ते आमचे नेते आहेत, त्यांनी सभेला यावं, असं अशोक चव्हाण म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल समर्थकांचा मेळावा घेत, काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याची टीका केली होती. शिवाय त्यांची राजकीय भूमिका ते 27 तारखेला जाहीर करणार आहेत. सध्या ते जाहीरपणे शिवसेना-भाजप युतीचा प्रचार करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे विखे पाटलांवर काय निर्णय होतो, त्याकडे लक्ष लागलंय.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे पाटलांचं मोठं वर्चस्व आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटलांनी थोरातांच्या बालेकिल्ल्यात बैठकींचं आणि मेळाव्यांचं सत्र सुरू केलं आहे. संगमनेरमध्ये सुजय यांनी आज पाच छोट्या-मोठ्या सभा घेत थोरातांवर टीकेची झोड उठवली. युतीचं प्रामाणिकपणे काम करा, पाच वर्षात घड्याळ आणि पंजा हद्दपार करू, असं भाष्य सुजय यांनी संगमनेरातील सभेत केलं.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात शिर्डी मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

संबंधित बातमी :

सुजय विखे शिर्डीत तळ ठोकून, विखे पाटलांकडूनही समीकरणांची जुळवाजुळव

Follow Us