काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच

| Updated on: Oct 05, 2020 | 11:49 AM

शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले.

काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच
Follow us on

मुंबई : काँग्रेसने मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला दिलेला शब्द पाळला. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून स्थायीच्या निवडणुकीतही काँग्रेस माघार घेणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले. (Congress withdraws candidature in BMC Standing Committee Election Shivsena won)

राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून काँग्रेसने आज महापालिकेतील शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. स्थायी समितीतही हेच चित्र राहणार आहे. मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहील, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष शिवसेनेला मतदान करणार आहेत. काँग्रेसने अर्ज मागे घेतला नसता तर भाजपने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे केले असते.

शिक्षण समितीसाठी भाजपकडून सुरेखा पाटील, शिवसेनेकडून संध्या दोषी, तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे रिंगणात होत्या. स्थायी समितीसाठी भाजपकडून मकरंद नार्वेकर, शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरिया मैदानात उतरले. आता शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोषी, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव निश्चित आहेत.

खरं तर, काँग्रेसच्या महापालिकेतील गोटात काही अंशी सेनेबद्दल नाराजी असल्याचं बोललं जात होतं. आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते असलेल्या काँग्रेसच्या रवी राजा यांनी बोलून दाखवली होती. मात्र आता सारे आलबेल असल्याचे चित्र आहे.

महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस ऐन वेळी माघार घेईल, असं सूचक वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं. तसंच केवळ स्थायी समितीच नाही तर सर्वच समित्यांवर शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येईल आणि शिवसेनेचा बीएमसीतील गड अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

काय म्हणाले होते अनिल परब?

राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे, हे भाजपने कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मुंबई महापालिकेत जरी काँग्रेस विरोधी बाकांवर असली, तरी सेनेला त्यांची अडचण नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं होतं.

भाजप आधी पहारेकरी होते आणि आता आक्रमक होत आहेत. मात्र शिवसेनेचा जन्मच आक्रमकतेतून झाला आहे, हे कुणीही विसरु नये. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती आणि इतर सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचाच अध्यक्ष बसणार, असा विश्वास परबांनी आधीच व्यक्त केला होता.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

संबंधित बातम्या :

BMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक, शिवसेनेसमोर भाजपसह काँग्रेसचेही आव्हान

(Congress withdraws candidature in BMC Standing Committee Election Shivsena won)