आता याचं कारायचं काय? दोन पाटलांच्या भांडणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें टेन्शनमध्ये
एक पाटील म्हणजे शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि दुसरे शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील.
मुंबई : खान्देशातल्या दोन पाटलांमधला वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यंत पोहोचलाय. दोन पाटलांच्या भांडणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें टेन्शनमध्ये वाढले आहे. एक पाटील म्हणजे शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि दुसरे शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील. गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत. तर चिमणराव पाटील पारोळ्याचे आमदार आहे. या दोघांमधला संघर्ष तसा फार नवा नाही. याआधी शिवसेनेत असतानाही दोन्हीकडच्या समर्थकांकडून एकमेकांवर पाडापाडीचे आरोप झाले आहेत. एकमेकांविरोधात कुरघोडीचे आरोप दोघांमध्ये होत आले आहेत.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीष पाटलांचे पुत्र रोहन पाटील हे चिमणराव पाटलांच्या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या गटात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी अनेक विकासकामांना मंजुरी दिली.
राष्ट्रवादीच्या गटानं आमदार चिमणराव पाटलांना भूमीपूजन कार्यक्रमांचं आमंत्रणही दिलं नाही. त्याउलट स्थानिक आमदाराऐवजी विरोधी गटाच्या भूमीपूजन कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले, आणि नेमका इथंच गुलाबराव आणि चिमणरावांमध्ये खटका उडाला.
चिमणराव पाटलांच्या मते गुलाबराव पाटील मुद्दामहून पारोळ्यात त्यांच्या विरोधकांना बळ देत आहेत. सत्ताधारी आमदार असूनही आम्हाला निधी न देता विरोधकांना निधी देऊ लागले आहेत. हे आरोप गुलाबराव पाटील फेटाळले आहेत.
आता या दोन्ही पाटलांमधल्या वादाची पार्श्वभूमी समजून घ्या. असं म्हटलं जातं की गुलाबराव पाटलांना कंटाळून चिमणराव पाटलांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. चिमणराव पाटील गुवाहाटीला पोहोचले. मात्र, त्यांच्यापाठोपाठ गुलाबराव पाटील सुद्धा शिंदे गटात आल्यामुळे चिमणराव पाटलांचा हिरमोड झाला.
या साऱ्या प्रकाराबद्दल मध्यंतरीच्या काळात चिमणराव पाटलांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. चिमणराव पाटलांना शिंदे गटात मंत्रीपदाची आशा होती. मात्र, सीनिअर आमदार असूनही गुलाबराव पाटलांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडल्यामुळे चिमणरावांच्या नाराजीत अजून भर पडली.
तूर्तास आमदारांची नाराजी. दोन आमदारांमधले वाद, प्रलंबित दुसरा मंत्रिमंडळ विस्तार या साऱ्या गोष्टी सरकारसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत.