Ghulam Nabi Azad : एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय जाऊ शकतो?; ‘त्या’ चर्चांना गुलाम नबी आझादांकडून पूर्णविराम

Ghulam Nabi Azad : एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय प्रवेश करू शकतो? असे अंदाज वर्तवण्याची मला चीड येते. मी कॉलेजमध्ये असल्यापासून काँग्रेसमध्ये होतो. मी कधीच भाजपमध्ये जाऊ शकत नाही. मी काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत माझा स्वत:चा पक्ष उतरवेल.

Ghulam Nabi Azad : एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय जाऊ शकतो?; त्या चर्चांना गुलाम नबी आझादांकडून पूर्णविराम
एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय जाऊ शकतो?; 'त्या' चर्चांना गुलाम नबी आझादांकडून पूर्णविराम
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2022 | 11:07 AM

नवी दिल्ली: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही गुलाब नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांचा काँग्रेसवरील हल्लाबोल सुरूच आहे. आजही त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने (Congress) आता भारत जोडो अभियान करण्यापेक्षा काँग्रेस जोडो अभियान हाती घ्यावं, अशी जोरदार टीका गुलाब नबी आझाद यांनी केली आहे. तसेच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची माझी इच्छा नाहीये. एक काश्मिरी भाजपमध्ये (bjp) कसा काय प्रवेश करू शकतो? असा सवाल करतानाच मी माझा स्वत:चा पक्ष स्थापन करणार आहे. तसेच या पक्षाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही आझाद यांनी जाहीर केलं. आझाद यांनी नवा पक्ष काढण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

डेक्कान हेराल्डने याबाबतचं वृत्त दिलं आहे. गुलाम नबी आझाद आता भाजपसोबत युती करतील, असं काँग्रेस नेत्यांकडून सांगितलं जात आहे. आझाद यांनी मात्र काँग्रेसचा हा मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय प्रवेश करू शकतो? असे अंदाज वर्तवण्याची मला चीड येते. मी कॉलेजमध्ये असल्यापासून काँग्रेसमध्ये होतो. मी कधीच भाजपमध्ये जाऊ शकत नाही. मी काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत माझा स्वत:चा पक्ष उतरवेल, असं आझाद म्हणाले.

नवा अध्यक्ष गांधी कुटुंबाच्या हातचं बाहुलं

काँग्रेसमध्ये पुढे पुढे करणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली. राहुल गांधी यांना ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाशी काही घेणंदेणं नाही. काँग्रेसने भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडो अभियान सुरू केलं पाहिजे. काँग्रेसला 19 ऑक्टोबर रोजी नवा अध्यक्ष मिळणार आहे. पण हा अध्यक्ष गांधी कुटुंबाच्या हातचं बाहुलं असेल, अशी टीका त्यांनी केली.

आझादांची टीका

आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना सोनिया गांधी यांना एक पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांना राहुल गांधींवर टीका केली होती. राहुल गांधी आपल्या अवतीभोवती अनुभव नसलेल्या लोकांना ठेवतात. राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक आणि पर्सनल स्टाफच सर्व निर्णय घेतो की काय असं वाटतंय. राहुल गांधी राजकारणात आल्यानंतर दुर्देवाने त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसची कार्यप्रणालीच उद्ध्वस्त करून टाकली. त्यांनी पक्षाची सल्लागार टीमच नष्ट करून टाकली, अशी टीकाही त्यांनी केली.