शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात पहिल्यांदाच ‘असं’ घडलं; राऊतांचा दबदबा वाढला?

| Updated on: Oct 25, 2020 | 11:13 PM

शिवसेनेच्या आज झालेल्या दसऱ्या मेळाव्यातून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण करून संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतले असले तरी या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांआधी फक्त शिवसेना नेते संजय राऊत यांचं एकट्याचंच भाषण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात पहिल्यांदाच असं घडलं; राऊतांचा दबदबा वाढला?
Follow us on

मुंबई: शिवसेनेच्या आज झालेल्या दसऱ्या मेळाव्यातून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण करून संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतले असले तरी या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांआधी फक्त शिवसेना नेते संजय राऊत यांचं एकट्याचंच भाषण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात ज्येष्ठ नेत्यांचीही भाषणं होत असतात मात्रं यंदा ही परंपरा मोडीत काढून फक्त राऊतांचंच भाषण झाल्याने शिवसेनेत राऊतांचा दबदबा वाढला की कोरोनामुळे कार्यक्रमच आटोपशीर घ्यायचा म्हणून ही तजवीज केलीय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (has sanjay raut’s domination increased in shiv sena?)

गेल्या चार दशकांपासून होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. या मेळाव्यातून शिवसेनेची दिशा आणि संकल्प व्यक्त केला जातो. दरवर्षी शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आधी काही नेत्यांना बोलण्याची संधी दिली जाते. उद्वव ठाकरे यांच्या आधी ग्रामीण भागातील एखादा आमदार किंवा मंत्री, मुंबईच्या महापौर, माजी मंत्री रामदास कदम, एकनाथ शिंदे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि मनोहर जोशी आदी क्रमाने दसरा मेळाव्याची भाषणे होतात. मात्र, यंदा भाषण क्रमाची ही परंपरा मोडीत काढण्यात आली. संजय राऊत यांचं भाषण झाल्यानंतर थेट उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आणि कार्यक्रमाची सांगता झाली. विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे स्टेजवर असतानाही यापैकी एकालाही भाषणाची संधी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यातील ठाकरे सरकार बनविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या संजय राऊत यांनाच भाषणाची संधी देण्यात आल्याने राऊत यांचा पक्षातील दबदबा वाढल्याचे संकेत असल्याचंही बोललं जात आहे.

तर, दुसरीकडे राज्यात कोरोनाचं संकट असल्याने उद्धव ठाकरे यांनीच दसऱ्या मेळाव्याचा कार्यक्रम आटोपशीर घेण्याच्या सूचना केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच शाहीर नंदेश उमप यांचा एकच पोवाडा झाल्यानंतर फक्त दोन भाषणांनी कार्यक्रम संपवण्यात आल्याचंही बोललं जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मुख्यमंत्र्यांकडे असलेला वेळ या सर्वांचा गणित जुळवूनच हा कार्यक्रम आटोपशीर घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. असं असलं तरी ज्येष्ठ नेत्यांना डावलून दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाची फक्त राऊतांना संधी देण्यात आल्याने आगामी काही दिवस त्यावर तर्कवितर्क निघतच राहतील, असं जाणकारांचं म्हणणं आहे. (has sanjay raut’s domination increased in shiv sena?)

संबंधित बातम्या:

काळी टोपी घालणारे सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करत नाहीत; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग त्यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? नितेश राणेंचं टीकास्त्र

जीएसटी फसल्याचं मान्य करून रद्द करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडाडले

(has sanjay raut’s domination increased in shiv sena?)